शाळाप्रवेशाचे वेळापत्रक दुर्बल व वंचित घटकांसाठी आरक्षित असलेल्या केवळ २५ टक्के जागांवरील प्रवेशांपुरते मर्यादित ठेवून शालेय शिक्षण विभागाने उर्वरित जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या हजारो पालकांची निराशा केली आहे.
बालवर्गाच्या प्रवेशांबाबत शाळांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी प्रवेशांसाठी विशिष्ट वेळापत्रक आखून देण्याचा शालेय शिक्षण विभागाचा विचार होता. ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदे’चे माजी संचालक संजय देशमुख यांनी जून, २०११मध्ये याचे संकेत दिले होते. या पदावरून बदली होण्याआधी तसा प्रस्ताव त्यांनी शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला होता. विभागाने मात्र वेळापत्रक केवळ २५ टक्के आरक्षित जागांपुरते मर्यादित ठेवून पालकांची निराशा केली आहे. उर्वरित प्रवेशांवर कोणतेही र्निबध आणण्याचा सरकारचा विचार नाही, असे शालेय शिक्षण सचिव जे. एस. सहारिया यांनी आज स्पष्ट केले.