मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार केव्हाही कोसळू शकते, असे भाकीत वर्तवत मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक रविवारी रात्री झाली. त्या वेळी शरद पवार यांनी राज्यातील सद्य:स्थिती, नवीन शिंदे -फडणवीस सरकार यावर भाष्य केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आमदारांचा मोठा गट गेला असला तरी त्यांच्यात सर्व आलबेल नाही. अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रिपद मिळेल; पण अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील अंतर्गत नाराजी वाढेल. त्यातून एकनाथ शिंदे यांचे सरकार कधीही कोसळू शकते, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तवले. तसेच भाजपचा मुख्यमंत्री न झाल्याने भाजपच्या आमदारांनाही शिंदे-फडणवीस सरकार हे आपले वाटत नाही. त्याचा परिणाम या सरकारच्या स्थैर्यावर होणार आहे, असेही पवार यांनी विशद केले.

ही सर्व राजकीय परिस्थिती पाहता शिंदे सरकार कोसळल्यानंतर विधानसभेची निवडणूक होऊ शकते. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा, असा संदेश शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिला.

 दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची निवड होण्याची शक्यता आहे.