अमरावतीतील पोहरा-मालखेड जंगलातील स्थिती
वाघांच्या कार्यक्षेत्रात बिबटय़ा प्रवेश करत नाही आणि बिबटय़ाच्या कार्यक्षेत्रात वाघाने प्रवेश केला, तर बिबटय़ाला त्या क्षेत्रातील अस्तित्व कमजोर होते. वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची लढाई वर्षांनुवष्रे अशीच सुरू आहे. अमरावती जिल्ह्य़ातील पोहरा-मालखेडच्या जंगलात वाघ आणि बिबटय़ाच्या अस्तित्वाची लढाई तीव्र झाली आहे. मात्र, या प्रकरणात वनखात्याची वाघाला संरक्षण देण्याची आणि बिबटय़ाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका अचंबित करणारी आहे.
अमरावती जिल्ह्य़ातील पोहरा-मालखेडच्या जंगलात बिबटय़ासह इतर वन्यप्राण्यांचे अस्तित्व होते, पण अनेक वर्षांत या जंगलातून वाघाचे अस्तित्वच नाहीसे झाले होते. डिसेंबर २०१४ मध्ये बोर व्याघ्र प्रकल्पातून सुमारे १७० किलोमीटरचे अंतर पार करून वाघाने या जंगलात प्रवेश करून साऱ्यांनाच आश्चर्यात टाकले. मेळघाट-महेंद्री-पोहरा-टिपेश्वर-बोर पुढे पेंच आणि सातपुडा अशी ही संलग्नता आहे. वाघाचे अस्तित्व सिद्ध झाल्सानंतर वाघ की वाघीण, असा वादही उद्भवला आणि दोन महिन्यानंतर तो साडेतील वर्षांचा वाघ असण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्याच्या प्रत्येक हालचालीवर वनखात्याची नजर असली तरीही या परिसरातील बिबटय़ांकडे मात्र वनखात्याने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
या वाघाने सध्या ३० बाय १५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र आपल्या ताब्यात घेतल्यामुळे या परिसरातील सुमारे १७ बिबटय़ांच्या अस्तित्वावर गंडांतर आले आहे. अमरावती शहरातील राज्य राखीव पोलीस दलाची वसाहत, अर्जूननगरातील कृषी महाविद्यालयाचा परिसर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आदी ठिकाणी नागरिकांना अधूनमधून बिबटय़ाचे दर्शन होत असल्याने ते भयभीत झाले आहेत. दरम्यानच्या काळात या वाघालाच इतरत्र स्थलांतरित करण्याचा नवा फंडा वनखात्याने शोधून काढला होता. मात्र, वन्यजीवप्रेमींच्या विरोधामुळे वनखात्याने हा प्रस्ताव स्थगित ठेवला आहे. वनखात्याने सध्या या वाघावरच पूर्णपणे लक्ष्य केंद्रित केले असून, जंगलातून बाहेर पडणाऱ्या बिबटय़ांबाबतचे नियोजन पूर्णपणे ढासळले
आहे.

वाघाचे स्थलांतर नाही
यासंदर्भात अमरावतीच्या उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांच्याशी संपर्क साधला असता, वाघाला स्थलांतरीत करण्याचा आमचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या परिसरातील बिबटय़ाचे अस्तित्त्वसुद्धा कायम असून मानवी वस्तीकडे शिरकाव करण्याच्या कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत. पोहरा-मालखेडच्या जंगलातील वन्यजीव व्यवस्थापन व्यवस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.