वर्धा : सध्या काँग्रेसची जनसंवाद यात्रा सुरू आहे. ही यात्रा पक्षातील एकजुटीचे प्रदर्शन ठरावे, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी व्यक्त केली होती. मात्र तसे घडताना दिसत नाही. यात्रा सध्या आमदार रणजित कांबळे यांच्या देवळी मतदारसंघात सुरू आहे. त्यांच्या समर्थकांनी लावलेल्या पोस्टरमध्ये दोन चेहरे दिसत नसल्याने चर्चा सुरू झाली. एक म्हणजे याच परिसरात राहणाऱ्या प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकस तर दुसरा चेहरा म्हणजे सुनील केदार. टोकस व कांबळे हे मावस भाऊ बहीण होत. माजी प्रदेशाध्यक्ष प्रभाताई राव यांच्या कन्या असलेल्या चारुलता गत लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. मात्र सक्रिय असल्याने त्यांचे राजकीय अस्तित्व कांबळे यांना मान्य नसल्याचे म्हटल्या जाते. ही बहीण भावातील धुसफूस सतत वाढतच गेली. आता तर परस्परविरोधी भूमिका घेतल्या जात असल्याचे चित्र आहे. हेही वाचा - अमरावती : घरगुती वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून केली हत्या आणि स्वतःच फोन करून दिली माहिती हेही वाचा - कुलर ठरला किलर! विजेचा धक्का लागून मायलेकाचा मृत्यू; आर्णी तालुक्यातील घटना बाजार समिती निवडणुकीत दोघेही एकमेकांविरोधात होते. जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी फोटो नसल्याची बाब मान्य करीत अधिक भाष्य टाळले. गंमत म्हणजे यात्रा प्रारंभी आर्वी येथे एक समस्या निर्माण झाल्यावर एकाने काळेंच्या मतदारसंघात असा शब्दप्रयोग केला. तेव्हा चांदूरकर यांनी उसळून हे काय लावले, असे फटकारले. काळेंचा, कांबळेचा, शेंडेचा मतदारसंघ काय म्हणता, काँग्रेसचा म्हणा ना, असे चांदूरकर यांनी म्हणताच प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी हे एकदम बरोबर अशी पावती दिली. व्यक्ती नव्हे पक्ष मोठा समजा, असे ते म्हणाले. मात्र त्यानंतर तीसच किलोमीटर अंतरावर व्यक्ती, गट, अहंभाव हेच खरे असल्याचे प्रत्यंतर आले. इतरत्र जी एकीची भावना दिसते ती देवळीत का नाही, याचे उत्तर कोणी देत नाही. ताई म्हणतात यावर बोलण्याचे कारण नाही.