वर्षांतून सहा महिनेच वापरात; खर्च वाया जात असल्याने नाराजी नाशिक : मालेगाव तालुक्यात चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या रिपरिपमुळे शहरातील मोठे उद्यान म्हणून उदयास आलेले राजमाता जिजाऊ उद्यान जलमय झाले आहे. उद्यानाला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षीचीच ही समस्या झाली असून उद्यान खोल भागात असल्याने पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात उद्यानात साचते. शिवाय निचऱ्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने निचरा होण्यास मोठा कालावधी लागतो. हे उद्यान शक्यतो डिसेंबर ते जून महिन्यातच नागरिकांना वापरास सुस्थितीत येते. उद्यानाच्या पूर्व दिशेला मोठय़ा प्रमाणात पाणी साचले असून त्यात शेवाळ वाढण्यास सुरुवात झाली आहे. या साचलेल्या पाण्यात डास वाढले असून आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रवेशद्वाराच्या दुतर्फा भिंती खचलेल्या आहेत. वेळीच दुरुस्ती न झाल्यास त्याला लागून असलेल्या भिंती पडण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या परिसरातील व्यापारी संकुलातही पावसाचे पाणी साचल्याने मोटारीच्या साहाय्याने ते काढण्यात येत आहे. ही समस्या अगोदरपासूनच या परिसरात असल्याने महानगरपालिकेने उद्यान उभारताना या शक्यतेकडे दुर्लक्ष केल्याची नागरिक तक्रार करत आहेत. शिवाय ज्या जागी उद्यान उभारण्यात आले त्या जागी पूर्वीपासूनच मोठा खड्डा असल्याने जलतरण तलाव करण्यास योग्य जागा असल्याने तसे झाले असते तर मालेगांवातून उत्कृष्ठ जलतरणपटू तयार होण्यास मदत झाली असती, अशी प्रतिक्रि या व्यक्त होत आहे. साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी पसरल्याने परिसरातील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उद्यानासमोरील रस्ताही खड्डेमय असून दुरुस्तीची नितांत गरज आहे. परिसरातील पावसाचे पाणी वाहून आपसूकच खोल खड्डयात जमा होते. त्यामुळे उद्यान पावसाळ्यात पूर्णपणे पाण्याने भरलेले असत.े त्यामुळे त्याचा बारमाही वापर होत नाही. शहरातील एकमेव मोठे उद्यान असल्याने शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मोठय़ा प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. लहान मुलांना खेळण्यासाठी अधिक साहित्य, उपकरणे वाढविण्याची गरज आहे. याविषयी सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार यांनी माहिती दिली. ही जागा जलतरण तलावासाठी आरक्षित होती. महानगरपालिकेने सर्वांगीण विचार न करता उद्यान उभारले.आता वर्षांतून फक्त सहा महिने उद्यानाचा वापर करता येतो. जनतेचा कररुपी पैसा पाण्यात घालण्याचे काम झाले आहे, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक आण्णा सावंत यांनी उद्यान बनवितांना पूर्णपणे सपाटीकरण केले असते तर आज इतके पाणी साचले नसते, असे मांडले. वरिष्ठांना रस्त्यावर फिरण्याचा व्यायाम करणे अवघड जाते. उद्यान झाल्यामुळे बरे वाटले होते. परंतु, ते फक्त वर्षांतून पाच ते सहा महिने उपयोगात येत असल्याचे दु:ख असल्याचे त्यांनी नमूद केले.