स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सिग्नलवर प्लास्टिक झेंडय़ांची विक्री

राज्यभर सर्वत्र प्लास्टिकबंदी लागू असून प्लास्टिकची पिशवी अथावा इतर वस्तू आढळल्यास दंड वसूल करण्यात येत असताना, शहारात अद्याप प्लास्टिकचा वापर सुरूच आहे. स्वतंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांच्या सिग्नलवर प्लास्टिक ध्वजांची विक्री सर्रास सुरू आहे. यांच्यावर कोण कारवाई करणार, असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दर वर्षी रस्तोरस्ती लहान-मोठय़ा आकारांतील ध्वज विकले जातात. त्यांना मागणीही मोठी असते, मात्र दुसऱ्याच दिवशी हे ध्वज कचऱ्यात पडलेले आढळतात. विविध सामाजि संस्था हे ध्वज गोळा करण्याचे उपक्रम राबवतात.

प्लास्टिकच्या झेंडय़ांचे तर विघटनही होत नाही. ध्वजाचा अवमान टाळण्यासाठी याआधीच प्लास्टिकच्या तिरंग्यांवर बंदी घालण्यात आली होती. आता तर प्लास्टिक वापरावरच बंदी घालण्यात आली आहे. असे असताना नवी मुंबईत मात्र खुलेआम प्लास्टिकच्या तिरंग्यांची विक्री सुरू आहे. बेलापूर येथील अर्बन हाट परिसरात सिग्नलवर लहान मुले प्लास्टिकचे झेंडे विकत आहेत.

दुकानात मात्र कापडी झेंडेच विकले जात आहेत. प्लास्टिक बाळगल्याचे आढळल्यास ५००० रुपये दंड होईल, या भीतीपोटी कापडी झेंडय़ाचा पर्याय निवडल्याचे विक्रेते सांगत आहेत. सध्या दुकानात विकले जाणारे कापडी झेंडे हे आकारानुसार ५ ते ५० रुपयांपर्यंत आहेत. प्लास्टिक झेंडे १ ते ५ रुपयांत मिळत.

प्लास्टिक पिशवीचा वापर

राज्य सरकारच्या आधीच नवी मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिकबंदी लागू केली असताना तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येत असतानाही अद्याप काही किराणा, भाजी, मासे, मटण विक्रेते प्लास्टिक पिशवीचा वापर करत आहेत.