मद्यपी चालकाच्या एका चुकीमुळे तीन जणांना आपले प्राण गमावण्याची घटना गुरुवारी रात्री अकरा वाजता जेएनपीटी मार्गावर घडली. कुंडेवहाळ गावाजवळ मारुती एस्ट्रा या चारचाकी वाहनाच्या मद्यपी चालकाने भरधाव वेगाने या मार्गावर वळसा नसतानाही वळसा घेतला आणि त्याची मारुती कार दुभाजक ओलांडून समोरील मार्गावरून येणाऱ्या ट्रेलरला जाऊन आदळली. या विचित्र अपघातामध्ये चारचाकी वाहनामधील चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. मनीषकुमार सिन्हा, रवीकुमार कनोजीया, प्रेमचंद कनोजीया अशी या मृत तरुणांची नावे आहेत. हे तिघेही नवीन पनवेल नोडमध्ये राहात होते. मनीषकुमार हा उरण येथे कामाला होता. रवीकुमार व प्रेमचंद हे मनीषकुमारच्या घराजवळ धोब्याचा व्यवसाय करणारे त्याचे मित्र आहेत. मनीषसोबत रात्री जेवण करून नवीन पनवेल येथे घरी येत असताना ही घटना घडली.