पालघर : केळवे जंजिरा जलदुर्गाच्या पडझडीचा वेग वाढला आहे. त्यामुळे पुरातत्त्व खात्याने या दुर्गाच्या डागडुजीची मोहीम तातडीने हाती घेणे गरजेचे बनले आहे. पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक जलदुर्गातील स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दुर्ग म्हणजे जंजिरे केळवा (केळवे समुद्र, दांडाखाडी) परंतु बाकीच्या अनेक किल्ल्यांप्रमाणेच शासनाने या किल्ल्याकडेही वेळेत लक्ष न दिल्याने त्याची दुरवस्था होताना दिसत आहे. केळवे प्रांतातील लहान-मोठे बुरूज, भुईकोट, जलदुर्ग अशाच दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. केळवे पर्यटनामध्येही यापैकी कशाचाच फारसा विचार केलेला नाही त्यामुळेच इतिहासाचा हा अमूल्य ठेवा नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. किमान शंभर वर्षांहून अधिक काळ या दुर्गाकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. त्याची डागडुजी झालेली नाही. त्यामुळे पायाकडील बरेचसे चिरेबंदी दगड आणि त्यावरील चुन्याचा गिलावा याची सातत्याने पडझड होत आहे. सतत आदळणाऱ्या लाटांनी किल्ल्याच्या मागील तटबंदीची पडझड वाढवली आहे. लाटांच्या या माऱ्यामुळेच मुख्य तटबंदीत आधारासाठी असलेले लहान-मोठे दगड, माती, चुना गिलावा निघून ढासळत आहे. किल्ले वसई मोहिमेचे श्रीदत्त राऊत, प्रीतम पाटील व संवर्धन मोहिमेचे योगेश पाटील यांनी ९ मार्च रोजी आगामी संवर्धन आराखडा नियोजन पाहणी केली. त्यामध्ये किल्ल्याच्या तटबंदीच्या चिऱ्यांची पूर्वीपेक्षा अधिक पडझड झाल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनावर कोणतीही उपाययोजना न झाल्याने दुर्गमित्रांनीच आता संवर्धनासाठी पुरातत्त्वीय दृष्टीने आराखडा निश्चित केला आहे. ‘किल्ले वसई मोहीम’ व ‘संवर्धन मोहीम, केळव’ गेले दीड वर्ष यासाठी प्रयत्न करत आहे. सदर किल्ल्याच्या संवर्धनासाठी २००६ साली दोन्ही संघटनांनी महाश्रमदान मोहीम आयोजित केली होती. त्या वेळी गडाच्या अंतर्गत भागातील तटबंदीशी एकरूप झालेली परंतु गडासाठी धोकादायक असलेली झाडे काढली होती. अशा प्रकारच्या सातत्यपूर्ण मोहिमा हे गडप्रेमी आयोजित करत असतात. त्याचप्रमाणे दरवर्षी केळवे माहीम विजय दिनाचे औचित्य साधून ‘संवर्धन मोहीम, केळवे’ या संस्थेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम आणि भगवा ध्वज मानवंदना देण्यात येत असते. याविषयी बोलताना संस्थेचे प्रमुख, योगेश पालकर म्हणाले, केळवे जंजिरा संवर्धनासाठी सातत्याने होणारे श्रमदान आता पुरेसे नसून किल्ल्याच्या मुख्य डागडुजीची आवश्यकता आहे. नियोजित केलेल्या संवर्धनासाठी लागणारा वेळ, खर्च, मनुष्यबळ लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत. केळवे जंजिरा संवर्धनासाठी शासकीय व पुरातत्त्वीय पातळीवर उपाययोजना होणे काळाची गरज आहे. जलदुर्गाच्या यादीत मानाचे स्थान प्राप्त झालेले गडकोट केवळ दुर्लक्षामुळे भुईसपाट होणे अतिशय दुर्दैवी आहे. - श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक