Loksabha Election 2024 आज लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमधील आठ मतदारसंघांसाठी आज मतदान होणार आहे. त्यात मथुरा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीमुळे मथुरेच्या मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार शहरातील शाही ईदगाह मशीद परिसर आणि कृष्ण जन्मस्थानावरील वाद मिटवतील. शाही ईदगाह आणि कृष्ण जन्मभूमी वादाचा भाजपा नेत्यांच्या भाषणात उल्लेख आढळत नसला तरी स्थानिकांमध्ये या विषयावर चर्चा होत आहे. मथुरेत आज मतदान आहे, हिंदूंचे मत याच मुद्दयावरुन भाजपाकडे वळण्याची शक्यता आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या विद्यमान खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांना त्यांच्या विरोधकांकडून कठोर आव्हानाचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यावर आजही विरोधकांकडून ‘बाहेरील’ असल्याचा टॅग लावला जात आहे आणि बंबईवाली संसद (मुंबईच्या खासदार) अशी टीका केली जात आहे. विरोधकांकडून मतदारांना स्थानिक ‘ब्रिजवासी’ नेता निवडण्याचेही आवाहन केले जात आहे.

हेही वाचा : हेमा मालिनी, अरुण गोविल राजपूत समाजाच्या रोषाला कसं सामोरं जाणार?

जाट मतदारांचे वर्चस्व

भाजपाने राष्ट्रीय लोक दलाशी (आरएलडी) युती केली असल्यामुळे जाट मतदार भाजपा उमेदवाराला मत देतील अशी भाजपाला अपेक्षा आहे. मथुरा मतदारसंघातील अंदाजे ४५ टक्के लोकसंख्या जाट आहे. विशेष म्हणजे भाजपा उमेदवार हेमा मालिनी जाटांची सून आहे. त्यांचे पती आणि अभिनेता धर्मेंद्र जाट आहेत. असे असले तरीही समाजाचा एक भाग स्थानिक उमेदवारांना पसंती देतो.

बसपचे उमेदवार सुरेश सिंह हे जाट समाजाचे आहेत. त्यांनी आपल्या भाषणांदरम्यान मतदारांना वारंवार आठवण करून दिली, “ध्यान रखिये, अपना ही काम आएगा (लक्षात ठेवा, आपलेच मदत करतील).” योगायोगाने, बसपमध्ये येण्यापूर्वी सिंह हे विहिंपशी संबंधित होते. काँग्रेस-सपा युतीने मथुरेत काँग्रेसचे उमेदवार मुकेश धनगर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही “नही चाहिये प्रवासी, अबकी बार ब्रिजवासी (आम्हाला बाहेरचा माणूस नको, यावेळी स्थानिक निवडा)”, असा नारा देत, भाजपावर हल्ला चढवला आहे.

‘विकसित मथुरा, हेमा की गॅरंटी’

आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत, हेमा मालिनी यांनी चार पानांची एक पुस्तिका प्रसारित केली आहे, ज्यामध्ये मालिनी यांनी मथुरेला त्यांची ‘कर्मभूमी (कामाचे ठिकाण)’ म्हणून संबोधले आहे. या पुस्तिकेत त्यांनी आपल्या दशकभराच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांवरदेखील प्रकाश टाकला आहे. विद्यमान खासदार हेमा मालिनी यांच्या प्रचारसभेत, पंतप्रधानांच्या ‘मोदी की गॅरंटी’ या घोषणेसारखेच ‘विकसित मथुरा, हेमा की गॅरंटी’सारख्या घोषणा दिल्या गेल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेमा मालिनी यांच्या प्राचारसभेत (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

भाजपाचे मथुरा मीडिया प्रभारी श्याम चतुर्वेदी म्हणतात की, हेमा मालिनी यांचे विरोधक ‘बाहेरील’ असल्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत, कारण भाजपाला लक्ष्य करण्यासाठी त्यांच्याकडे इतर कोणतेही मुद्दे नाहीत. “हेमाजी अनेक दशकांपासून मथुराशी संबंधित आहेत. तसेच येथील सर्व लोकप्रतिनिधी भाजपाचे असल्याने ते जनतेच्या समस्या मांडतात,” असे त्यांनी सांगितले.

हेमा मालिनी यांना मथुरावासीयांची किती पसंती?

मथुरेतील सगळ्यांनाच श्याम चतुर्वेदी यांचे म्हणणे पटलेले नाही. “मालिनी यांनी मथुरेत विकासकामे केली आहेत, पण हे सर्व मोठे प्रकल्प आहेत. स्थानिक समस्यांसाठी त्या कधीच गावात आल्या नाहीत,” असे मथुरेतील हथोडा गावातील जाट प्रीतम सिंह म्हणाले. ते पुढे म्हणाले की, हिंदूंना कृष्ण जन्मस्थानाला अयोध्येच्या राम मंदिरासारखे भव्य स्वरूप प्राप्त व्हावे असे वाटत असले, तरी ते मंदिरांच्या मुद्द्यावर मतदान करणार नाहीत.

“भाजपा केवळ मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी असे मुद्दे उपस्थित करते. मंदिर माझ्या कुटुंबाला अन्न देणार नाही. महागाई आणि बेरोजगारी या प्रमुख समस्या आहेत,” असे त्यांनी सांगितले. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाला मतदान करणारे त्याच गावातील जाट किशन सिंह म्हणाले की, मी यावेळी ‘बाहेरील’ व्यक्तीला मतदान करणार नाही. “जो आमच्यासाठी उपलब्ध असेल, अशा स्थानिक नेत्याला भाजपा संधी का देत नाही?” असा प्रश्न त्यांनी केला.

हथोडा गावातील जाट सुलखान सिंह यांनी भाजपाने आरएलडीबरोबर युती केल्याने भाजपाला मत द्यायचे ठरवले. ते म्हणाले, “जहाँ चौधरी का परिवार, वहा हम (मी नेहमीच चौधरी चरणसिंह यांच्या कुटुंबाबरोबर असतो).” जाट, प्रजापती आणि जाटव (दलित) यांची संमिश्र लोकसंख्या असलेल्या अरतौनी गावातील नेक शाह सांगतात की, ते मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक स्तरावर उंचावलेल्या प्रतिमेमुळे प्रभावित आहेत. परंतु, ते पुढे म्हणाले, “नोकऱ्या कुठे आहेत? सरकारने नोकरीसाठी ‘अग्निवीर’ योजना सुरू केली, परंतु ती निरुपयोगी आहे.”

शाही ईदगाह-कृष्ण जन्मस्थानाचा वाद

मथुरेच्या डीग गेट परिसराजवळील इस्लामिया मार्केटमध्ये राहणारे कादिर कुरेशी यांना २०१७ मध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर कत्तलखाने बंद करावे लागले होते, ज्यानंतर ते बेरोजगार होते. ते म्हणाले, “हिंदू अभिमानाने सांगतात की, भाजपा सरकारने मुस्लिमांवर अत्याचार केले आहेत.” सध्या सुरू असलेल्या शाही ईदगाह वादावर कुरेशी म्हणाले, “राम मंदिर आधीच बांधले गेले आहे. आता त्यांनी ज्ञानवापीमध्ये प्रवेश करून बंदिस्त तळघरात पूजा सुरू केली आहे. मथुरेतही ते असेच करतील. भाजपा सत्तेत राहिल्यास हिंदूंना जे हवे ते मिळेल,” असे त्यांनी सांगितले आणि भाजपाच्या विरोधात लढा देणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पण, इतर मतदारांमध्ये या वादग्रस्त जागेवर मंदिर पाहण्याची इच्छा आहे. ठाकूर आणि परिसरातील व्यापारी उमेश सिंह यांचा विश्वास आहे की, जर मोदींना तिसरी टर्म मिळाली आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आली, तर कृष्ण जन्मस्थानावर नक्कीच मंदिर बांधले जाईल. शाही ईदगाहच्या परिसराजवळील विक्रेत्या भूरी देवी म्हणाल्या, “४० वर्षांपूर्वी लग्नानंतर मी राजस्थानमधून येथे आले, तेव्हापासून मी एक मशीद पाहत आहे. मला विश्वास आहे की, एक दिवस मथुरेत भव्य मंदिर बांधले जाईल.”

२०१९ च्या निकालाची पुनरावृत्ती?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मालिनी यांनी आरएलडीचे कुंवर नरेंद्र सिंह यांचा २.९३ लाख मतांनी पराभव केला होता. त्यावेळी आरएलडीची सपा आणि बसपबरोबर युती होती. त्यावेळी काँग्रेसचे महेश पाठक यांना केवळ २८,०८४ मते मिळाली होती.

हेही वाचा : सॅम पित्रोदा आणि गांधी घराण्याचं नेमकं काय कनेक्शन?

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा आरएलडी आणि सपा यांची युती होती, तेव्हा भाजपाने मथुरा लोकसभा मतदारसंघातील पाचही विधानसभा जागा जिंकल्या होत्या. भाजपाला २०१९ च्या निकालाची पुनरावृत्ती होण्याचा विश्वास आहे. “मथुरा ही भाजपासाठी सुरक्षित जागा आहे. यावेळी आरएलडीही आमच्याबरोबर आहे,” असे भाजपाचे मथुरा मीडिया प्रभारी श्याम चतुर्वेदी म्हणाले.