तुम्हाला आठवतंय का?, एका वृत्तवाहिनीवर भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना सडेतोड उत्तरे देऊन त्यांचीही बोलती बंद करणारे काँग्रेसचे प्रवक्ते एकदमच प्रकाशझोतात आले होते. तेव्हापासून ते समाजमाध्यमांवर प्रचंड गतीने व्हायरलही झाले आणि काँग्रेसलाही त्याच तोडीचा एक ‘संबित पात्रा’ मिळाला, असं म्हणून अनेकांनी त्यांच्या वाक्चातुर्याचं कौतुकही केलं होतं. होय, काँग्रेसच्या त्या प्रवक्त्याचं नाव म्हणजे गौरव वल्लभ! पण, गंमत अशी की, ते आता काँग्रेसचे राहिले नसून गेल्या गुरुवारीच ‘भाजपावासी’ झाले!

खरं तर गौरव वल्लभ हे काही काँग्रेसमध्ये तळागाळातून आलेले नेते नव्हते, वा त्यांच्यामागे लोकांची ताकद होती, असंही नव्हतं. मात्र, तरीही एकेकाळी काँग्रेस पक्षाची हिरिरीने बाजू मांडणारा आणि चक्क संबित पात्रा यांची बोलती बंद करणारा प्रवक्ता जेव्हा काही कारणे देऊन पक्ष सोडतो, तेव्हा काँग्रेससाठी त्याने दिलेली ती ‘कारणे’ नक्कीच अस्वस्थता निर्माण करणारी ठरू शकतात.

K C Venugopal came to have a seat at the Congress high table
कसे झाले वेणुगोपाल काँग्रेसमधील सत्ताकेंद्र? काँग्रेस नेत्यांच्या आऊटगोइंगला का ठरताहेत कारणीभूत?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”

राम मंदिर उद्घाटनाला उपस्थित न राहणं, हे काँग्रेसनं केलेलं पाप

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना गौरव वल्लभ (वय ४७) यांनी काँग्रेस पक्ष सोडण्यामागच्या कारणांविषयी सविस्तर भाष्य केलंय. ते म्हणाले की, “अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित न राहणं आणि त्याविषयी उदासिन राहणं हे मोठं पाप आहे. त्यातून मिळणारे राजकीय लाभ वा तोटा हे मुद्दे बाजूला ठेवा, पण ही गोष्ट पाप आहे. तेव्हापासून तुम्ही मला कधी कोणती पत्रकार परिषद घेताना किंवा एखाद्या टेलिव्हिजन कार्यक्रमात बोलताना पाहिलंय का? खरं तर मी तेव्हापासूनच ‘अखिल भारतीय काँग्रेस समिती’मध्येही गेलो नाहीये.”

वल्लभ यांनी पुढे असं म्हटलंय की, सनातन धर्माविषयी करण्यात आलेली टिप्पणीही त्यांच्या जिव्हारी लागली असून त्यावरूनही ते पुरते अस्वस्थ झाले होते. “मी प्रत्येक काँग्रेस नेत्याकडे जाऊन हेच सांगत राहिलो की, आपल्या सोबतच्या पक्षाने (दक्षिणेतील द्रमुक) तसेच आपल्याच पक्षातील काहींनी सनातन धर्माविषयी केलेल्या वक्तव्यामुळे आपला उत्तर भारतात पुन्हा एकदा पराभव होणार आहे, पण कुणीच माझं ऐकलं नाही”, असं ते म्हणाले.

हेही वाचा : पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ

काँग्रेसमध्ये कसा राहिलाय वल्लभ यांचा प्रवास?

२०१७ मध्ये काँग्रेसमध्ये आलेल्या गौरव वल्लभ यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उदयपूरमधून काँग्रेसचा किल्ला लढवला, मात्र त्यांचा पराभव झाला. गौरव वल्लभ यांचा जन्म उदयपूरचा आहे. मात्र, ते २००२ पासून तिथे राहत नाहीत. गेल्या गुरुवारी पक्ष सोडताना त्यांनी आपल्या पराभवाचं खापर हे ‘सनातन धर्माविषयी द्रमुक पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर’ फोडलं आहे. ते म्हणाले की, “प्रत्यक्ष मैदानात काय सुरू आहे, याची काँग्रेसला जराही कल्पना नाही. तुम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला गेला नाहीत, तुम्ही पापी आहात.”

उदयपूरमध्ये झालेला पराभव हा गौरव वल्लभ यांचा निवडणुकीच्या रिंगणातला दुसरा पराभव होता. २०१९ मध्ये त्यांनी जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पक्षप्रवेशानंतर अवघ्या दोन वर्षातच त्यांना ही संधी मिळाली होती. मात्र, ते मतमोजणीत तिसऱ्या क्रमांकावर होते. २०२२ मध्ये मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद बहाल करणाऱ्या निवडणुकीतही ते खरगे यांच्या गटामध्ये नियोजनात होते. त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या शशी थरुर यांच्यावर टीका केल्यानेही ते वादात सापडले होते, तर दुसरीकडे ते हाय कमांड असलेल्या सोनिया गांधींचे अधिकृत उमेदवार मानले जाणाऱ्या अशोक गेहलोत यांना समर्थन देताना दिसले होते. त्यांच्या या कृतीमुळेच काँग्रेसला असा आदेश द्यावा लागला होता की, ‘प्रवक्त्यांनी आणि AICC च्या संपर्क विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारावर कोणत्याही प्रकारची टिप्पणी करू नये.’

उच्चपदस्थ नेतृत्वाबद्दलच्या नाराजीची भलीमोठी यादी!

एकीकडे काँग्रेस पक्षाने फार कमी कालावधीत वल्लभ यांना बरंच काही देऊ केलेलं असलं, तरीही गौरव वल्लभ म्हणतात की, त्यांच्याकडे मात्र पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल असलेल्या नाराजीच्या मुद्द्यांची भलीमोठी यादीच आहे. “मी उच्चपदस्थ नेत्यांना वारंवार ही आठवण करून दिली होती की, पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने उदारीकरण, जागतिकीकरण आणि खासगीकरणाचं धोरण आणलं होतं. डॉ. मनमोहन सिंह हे तेव्हा अर्थमंत्री होते. मी नेतृत्वाला हे सांगत होतो की, आपण अंधपणे सगळ्याला विरोध करायला नको. मात्र, पक्ष प्रत्येक निर्गुंतवणुकीला विरोध करत राहिला. टाटांनी एअर इंडिया विकत घेतली, तुम्ही टाटांवर टीका केली. संपत्तीची निर्मिती करणाऱ्या प्रत्येकावर टीका केली गेली. याआधी भूतकाळात आपण संपत्ती निर्माण करणाऱ्यांचं स्वागतच करायचो. कारण ते आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात आणि रोजगार निर्मितीमध्ये योगदान द्यायचे.”

पुढे वल्लभ म्हणाले की, “मी माझ्या दृष्टीने असलेले सगळे चिंतेचे मुद्दे उच्चपदस्थ नेतृत्वाला सांगत राहिलो, मात्र कुणीही माझं ऐकून घ्यायला तयार नव्हतं. ते मला सांगत राहिले की, तुम्ही सरचिटणीस असलेल्या के. सी. वेणूगोपाल यांच्याशी बोला. आता वेणूगोपाल यांना उदारीकरण कळेल का?”

पुढे ते म्हणाले की, “काँग्रेसचा जाहीरनामा गेल्या २५ वा तेच ते लोक तयार करत आहेत. काँग्रेसला मते मिळाली का? राज्यसभेचे खासदार इम्रान प्रतापगढी आणि गुजरात काँग्रेसचे खासदार जिग्नेश मेवाणी असे लोक जाहीरनामा समितीमध्ये आहेत. देव सर्वांना सद्बुद्धी देवो, इतकंच मी म्हणेन.”

राजकारणात येण्यापूर्वी वल्लभ हे जमशेदपूरमधील सुप्रसिद्ध अशा एक्सएलआरआयमध्ये प्राध्यापक होते. ते डॉक्टरेट असून अधिकृत असे आर्थिक जोखीम व्यवस्थापक आणि चार्टर्ड अकाउंटंट आहेत.

हेही वाचा : LS Election 2024: “लोकशाहीसाठी ‘जिंका वा मरा’ अशी निवडणूक”, मोदी सरकार विरोधात स्टॅलिन यांचे रणशिंग!

आधी भाजपावर जहरी टीका; आता ‘भाजपावासी’ होऊन भलामण!

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या वाक्चातुर्यामुळे त्यांना लागलीच प्रसिद्धीही मिळाली आणि प्रवक्तेपदही मिळालं. २०१९ मध्ये संबित पात्रा यांच्यासोबत एका टीव्ही वृत्तवाहिनीवर झालेल्या वादविवादात त्यांनी संबित पात्रा यांची बोलती बंद केल्यानंतर ते विशेषत: अधिक चर्चेत आले होते. भारत २०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर असणारी अर्थव्यवस्था होईल, असा दावा संबित पात्रा करत होते, तेव्हा ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात, असा धोशा त्यांनी लावून धरला होता. त्यांच्या या वादविवादाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र, आता अचानकच काँग्रेसची साथ सोडत ज्यांच्यावर जहरी टीका केली, त्याच भाजपासोबत जाण्याचं नैतिक समर्थन कसं काय करणार, असा प्रश्न विचारला असता गौरव वल्लभ म्हणाले की, “नोकरीच्या मुलाखतीमध्ये अत्यावश्यक अट आणि इष्ट अट अशा काही अटी असतात. माझ्या अत्यावश्यक अटीमध्ये राष्ट्राचा विकास, आर्थिक विकास, आर्थिक समृद्धी आणि शेवटचं तरीही महत्त्वाचं म्हणजे धर्माचे रक्षण हे मुद्दे आहेत. काँग्रेस माझ्या या सगळ्याच अत्यावश्यक अटींना चूड लावत होती. अशावेळी मी काय करणार? तिथे राहणं याचा सरळ अर्थ असा होत होता की, मी माझ्या अत्यावश्यक अटींना महत्त्व देत नाहीये. माझ्याकडे काँग्रेस सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. निव्वळ मोदी सरकारवर टीकास्त्र डागणं या पलीकडे जाऊन काँग्रेसला काहीतरी एक चांगलं विरोध करण्याचं तंत्र विकसित करणं गरजेचं आहे. “फक्त टीका करून काँग्रेस पुढे जाऊ शकत नाही. लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी पक्षांकडून अपेक्षित असलेली रचनात्मक टीका त्यांनी करायला नको का?”

पुढे ते म्हणाले की, “मला सत्तेची काहीही लालसा नाहीये. तसेही मी भाजपामध्ये अशावेळी गेलोय, जेव्हा त्यांचे जवळपास सगळेच उमेदवार घोषित झालेले आहेत. मी फक्त विचारधारेसाठी म्हणून काँग्रेसची वाट सोडून भाजपाची धरली आहे. माझ्यासाठी ‘वंदे मातरम’ ही पहिली, तर ‘जय श्रीराम’ ही दुसरी महत्त्वाची विचारधारा आहे.”