Home Minister Amit Shah Interview लोकसभा निवडणूक आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या लोकसभा निवडणुकीत एकीकडे एनडीए आणि दुसरीकडे इंडिया आघाडी या दोघांमध्येच मुख्य लढत पाहायला मिळाली. निवडणुकीच्या घोषणेनंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात सुरू झालेले दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत विरोधी पक्ष, निवडणुकांमधील जातीय मुद्दे, मणिपूर आणि तिसर्‍या टर्मसाठी निवडून आल्यास भाजपाची पुढील भूमिका काय असेल यावर आपली रोखठोक भूमिका मांडली.

काँग्रेसमुक्त भारत

विरोधी पक्षाविषयी प्रश्न केला असता, अमित शाह म्हणाले, “विरोधी पक्षात कोण असतील हे देशातील जनता ठरवेल, असं आपली राज्यघटना सांगते.” ५४२ पैकी भाजपाला तुमच्या अंदाजानुसार ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर याचा अर्थ जनतेला विरोधी पक्ष नको आहे का, या प्रश्नावर अमित शाह म्हणाले, हे केवळ जनताच ठरवू शकते.

हेही वाचा : भाजपाविरोधात पंजाबमधील शेतकर्‍यांचा रोष, तरीही दुप्पट मतांनी निवडून येण्याचा विश्वास; कारण काय?

तुम्ही जाहीरपणे काँग्रेसमुक्त भारताचा उल्लेख केला आहे, ते देशासाठी योग्य आहे का; यावर ते म्हणाले, “मी जेव्हा जेव्हा काँग्रेसमुक्त भारत म्हणतो तेव्हा विचारधारेच्या दृष्टीने म्हणतो. पण, तीही विचारधारा आता काँग्रेसमध्ये नाही.” ते पुढे म्हणाले, मजबूत विरोधी पक्ष असणे देशासाठी फायद्याचे आहे हे मला मान्य आहे, पण ते केवळ जनतेच्या हातात आहे.

पंतप्रधान मोदी लोकप्रिय असण्याची असंख्य कारणे

सक्षम प्रतिस्पर्धी नसणे हेदेखील भाजपाला मते मिळण्याचे एक कारण आहे का, यावर अमित शाह म्हणाले, विरोधकांच्या कमकुवतपणाचा पंतप्रधानांच्या राष्ट्रासाठीच्या ध्येयाशी काहीही संबंध नाही. ते इतके लोकप्रिय असण्याची असंख्य कारणे आहेत. १० वर्षांत ६० कोटी लोकांचे जीवनमान उंचावण्यापासून; त्यांना घर, शौचालय, पाणी, पाच लाख रुपयांची विमा योजना, पाच किलो धान्य, गॅस सिलिंडर देऊन त्यांनी सक्षम केले आहे. ज्या दिवशी करोनाची ओळख पटली त्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी लस मोहिमेचा निर्णय घेतला; १३२ कोटी लोकांच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. इतरत्र प्रगत राष्ट्रांमध्येही करोनाविरुद्धचा लढा प्रभावशाली ठरला नाही. कारण तिथे केवळ सरकारने लढा दिला, तर इथे सरकार आणि जनता एकत्र लढली.

तिसऱ्या टर्मसाठी भाजपा सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे हे केवळ सत्तेसाठी आहे का, यावर अमित शाह म्हणाले की, राज्यघटनेत मंत्रिमंडळाची तरतूद आहे. ती एका उद्देशासाठी आहे. अन्यथा आम्ही ५४२ लोकांमध्ये चर्चा करू शकतो, पण या तत्त्वावर देश चालतो का? मंत्रिमंडळ, पंतप्रधान ही सर्व कल्पना आमची नाही, तर संविधान सभेची आहे. ते (विरोधक)हरले आहेत, त्यामुळे त्यांना यापैकी काहीही नको आहे. इंदिराजी आणि नेहरूजींच्या नेतृत्वाखाली सत्तेचे केंद्रीकरण नव्हते का? त्यावेळी ते त्यांच्या पक्षांचेही अध्यक्ष झाले.

काश्मीरमध्ये भाजपाने निवडणूक का लढवली नाही?

कलम ३७० रद्द केल्यानंतर जवळपास पाच वर्षांनी जम्मू-काश्मीरमधील मतदान खूपच प्रभावी ठरले आहे. अमित शाह म्हणाले, “मला याचा अंदाज आला होता आणि मी संसदेत हे बोललो होतो; आता कोणाला ‘जम्मू-काश्मीर संविधान’, ‘जम्मू-काश्मीर झेंडा’ आठवत नाही. यावेळी भाजपाने काश्मीरमध्ये निवडणूक लढवायला हवी होती का? यावर ते म्हणाले, भाजपासाठी काश्मीरमध्ये निवडणूक लढवणे फारसे महत्त्वाचे नाही. चुकीच्या धोरणांमुळे भारतातील एक मोठा वर्ग ७० वर्षांपासून भारतापासून विभक्त होता. पण, आता तसे राहिले नाही आणि तेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेकांसाठी हा महत्त्वाचा प्रश्न असू शकतो की, भाजपाने निवडणूक का लढवली नाही. ७० वर्षे चुकीच्या धोरणांमुळे भारताचा एवढा मोठा भाग दहशतवाद आणि हिंसाचाराने ग्रासला होता. इथे ‘आझादी’ची हाक दिली जात होती, आता ही हाक तिकडे (पाकिस्तानात) दिली जात आहे. इथे दगडफेक होत होती, आता तिथे होत आहे. ती धोरणे योग्य होती असे ज्यांना वाटत होते त्यांनाही हे मान्य करावे लागेल, कारण हीच वस्तुस्थिती आहे.

राज्यघटना बदलली जाईल का?

सध्या आरक्षणावर चर्चा सुरू आहे, राज्यघटना बदलली जाईल, आरक्षणे जातील अशी भीती दलित वर्गातून व्यक्त होत आहे. हा मुद्दा कसा समोर आला? यावर अमित शाह म्हणाले की, तुमच्यापैकी काहींना आणि राहुल गांधींना वाटते की हा मुद्दा आहे, पण ही समजण्यासारखी गोष्ट आहे. आम्ही १० वर्षे सत्तेत आहोत आणि आमच्याकडे संख्याबळ होते. करायचं असतं तर तेव्हाच केलं असतं. आम्ही आमचे पूर्ण बहुमत कलम ३७०, ३५ अ हटवण्यासाठी, दहशतवाद हटवण्यासाठी, नक्षलवाद संपवण्यासाठी, राम मंदिर बांधण्यासाठी आणि ६० कोटी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी वापरले. इंदिराजींच्या काळात काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले, त्यांनी त्याचा वापर करून आणीबाणी आणली आणि १.३० लाख लोकांना तुरुंगात टाकले, वर्तमानपत्रात कोणती संपादकीये काढायची हे ठरवले. हा आमच्या पक्षाचा इतिहास नाही, हा राहुल गांधींच्या पक्षाचा इतिहास आहे.

भाजपाचा एकही मुस्लीम सदस्य नाही

भाजपाने ब्राह्मण-बनिया समाजातील अनेक घटकांना सामील करून घेतल्यामुळे भाजपाचा विकास झाला आहे. मग अजूनही मुस्लिमांपर्यंत पोहोच का नाही? भाजपाचा एकही मुस्लीम सदस्य नाही, यावर अमित शाह म्हणाले, “माझा तुष्टीकरणावर विश्वास नाही. आमची कोणतीही योजना धर्मावर आधारित नाही, आम्ही कोणाशीही भेदभाव केलेला नाही.” समाजात असुरक्षिततेची भावना का आहे, यावर ते म्हणाले, “आम्ही जे करत आहोत ते योग्य आहे, आम्ही आमच्या गरिबीविरोधी योजना सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. कोणावरही अन्याय होणार नाही, हा आमचा विश्वास आहे.

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर भाजपाची भूमिका

तुम्ही जम्मू-काश्मीरमधील महत्त्वपूर्ण विषयावर बोललात, मणिपूरचे काय? या प्रश्नावर शाह म्हणाले, मणिपूरची हिंसा आणि दहशतवाद सांप्रदायिक नसून जातीय आहे. त्यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे निवडणुकीनंतर याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल.

तुम्ही मणिपूरला भेट दिली आणि तेथे चार दिवस घालवले. तुम्हाला वाटते की पंतप्रधान यांनी जायला हवे होते? ते का गेले नाहीत? यावर ते म्हणाले, “मी पंतप्रधानांचा प्रतिनिधी आहे आणि तिथे जे काही चालले आहे ते माझ्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. पंतप्रधान याचा सातत्याने पाठपुरावा करत असून, तेथील परिस्थितीकडे बारकाईने लक्ष देत आहेत.

नक्षलवादाविरोधातील लढाईवरही अमित शाह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या पाच वर्षांच्या राजवटीत हा लढा मंदावला. आम्ही तिथे असल्यापासून पाच महिन्यांत १२५ नक्षलवादी मारले गेले, ३५० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, २५० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. नक्षलवाद दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जगणार नाही.”

वयाच्या पंचाहत्तरीनंतर मोदी निवृत्त होतील?

तुम्ही म्हणालात ७५ वर्षे वयाची अट पंतप्रधानांना लागू होत नाही, तशी ती पक्षातील इतर नेत्यांनाही लागू होत नाही का? यावर अमित शाह म्हणाले, असा कोणताही नियम नाही. काही निर्णय एका विशिष्ट परिस्थितीत घेतले गेले. जेव्हा ती परिस्थितीच अस्तित्वात नसते, तेव्हा ते नियमही नसतात. पुढेही पंतप्रधानच आमचे नेतृत्व करतील, हे मी स्पष्ट सांगू शकतो.

महाराष्ट्रात २०१९ मध्ये काय घडले?

२०१९ च्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा आम्हाला बहुमत मिळाले. शरद पवारांनी आमचे मित्र उद्धवजी ठाकरे यांना स्वतःबरोबर सामील केले. ते आमचे मित्र होते, आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती. तेव्हा कोणतेही नैतिक प्रश्न, नीतीमत्तेचे प्रश्न उपस्थित केले गेले नाहीत. खरं तर पत्रकार समाज म्हणून तुमचा दुटप्पीपणा आहे, असा आरोप त्यांनी माध्यमांवर केला. उद्धव ठाकरे यांना भाजपा परत स्वीकारेल का? यावर ते म्हणाले, आमची युती आता भक्कम आहे.

बिगर-भाजपा मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये न संपणारा संघर्ष

बिगर-भाजपा मुख्यमंत्री आणि त्यांचे राज्यपाल यांच्यात न संपणारा संघर्ष आहे. केरळमध्ये पिनाराई विजयन आणि आरिफ मोहम्मद खान; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि सीव्ही आनंदा बोस; दिल्लीत एलजीव्हीके सक्सेना आणि अरविंद केजरीवाल. याकडे तुम्ही कसे बघता? यावर अमित शाह म्हणाले, “मुख्यमंत्री-राज्यपालांच्या मुद्द्यावर जिथे जिथे अडचण आहे, तिथे आम्ही हस्तक्षेप केला आहे. जर तुम्ही संविधानाच्या विरोधात कायदा केला आणि राज्यपाल ते मंजूर करत नाहीत असे तुम्ही म्हणता, तर तसे होऊ शकत नाही.

हेही वाचा : सर्वच पक्षांविरोधात गावकर्‍यांमध्ये रोष? डझनभर गावांनी टाकला निवडणुकीवर बहिष्कार; कारण काय?

भाजपात सामील झालेल्या राजकारण्यांवर दाखल गुन्ह्यांचा योग्य तपास होतो का?

भाजपामध्ये सामील झालेले नेते आणि केंद्रीय यंत्रणांच्या भूमिकेवर तुम्ही भाष्य केले आहे. उदाहरणार्थ, अजित पवार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि नंतर तो मागे घेतला. यावर अमित शाह म्हणाले, मी या विशिष्ट प्रकरणाचा अभ्यास केला आहे. गुन्हा दाखल झाला की चार-पाच गुन्हे दाखल होतात. एक भ्रष्टाचाराचा, एक म्हणजे सत्तेचा गैरवापर, एक प्रशासकीय त्रुटींवर आणि एक म्हणजे पुराव्याशी छेडछाड. मुख्य प्रकरणाचे आरोपपत्र होते, त्यात ही चारही प्रकरणे गुंफली जातात. मुख्य आरोपपत्राबद्दल कोणीही बोलत नाही, परंतु चार प्रकरणे बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जातो. भाजपामध्ये सामील झालेल्या नेत्यावरील प्रत्येक प्रकरणात योग्य प्रक्रियेचे पालन केले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जर तिसरी टर्म असेल तर तुम्ही कोणत्या मंत्रालयाचे प्रमुख व्हाल? यावर अमित शाह म्हणाले, ते नरेंद्रभाई ठरवतील; ते माझ्या हातात नाही. पक्ष मला जे सांगेल ते करेन.