देशातील विरोधी पक्ष नेते भाजपाचा पराभव करण्यासाठी एकवटले आहेत. लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून, सर्व पक्ष दुसर्‍या टप्प्याच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नेतृत्त्व करत असून, ‘आयडिया एक्स्चेंज’ या कार्यक्रमात त्यांनी निवडणूक रणनीतीपासून तर काळा पैसा, बेरोजगारी, कलम ३७० यांसारख्या अनेक मुद्द्यांवर विरोधकांची भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न”

आपल्या प्रचार रणनीतीविषयी बोलताना ते म्हणाले, सत्ताधारी सरकारने अनेक अडथळे निर्माण केले आहेत. आम्ही माध्यमांना दिसत नसलो तरी आमची मोहीम खूप दिवसांपासून सुरू आहे. प्रत्येक राज्यात आमचे कार्यकर्ते युनिट बूथ आणि ब्लॉक स्तरावर कठोर परिश्रम घेत आहेत. त्याचबरोबर, आम्ही सर्वेक्षण आणि क्रॉस सर्व्हे करत आहोत आणि उमेदवार निवडताना या सर्व बाबींना विचारात घेत आहोत. आम्ही संघटितरित्या काम करत आहोत आणि भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

हेही वाचा : उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन

“मोदीजींचे ‘४०० पार’चे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ‘अबकी बार ४०० पार’. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात की, भाजपा १५० चा आकडाही पार करणार नाही. यावर तुमचे आकलन काय? यावर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, मोदीजींच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवणे कठीण आहे. एवढी अतिशयोक्ती करणारे मी पहिले पंतप्रधान पाहत आहे. पण त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. आम्ही भाजपाला दाखवून देऊ की, विरोधी पक्षांना नाही तर लोकांना बदल हवा आहे. पूर्वी भाजपा नेते जिल्ह्यात दोन-तीन सभा घ्यायचे, मात्र आता ते प्रत्येक गल्लीबोळात जोरदार प्रचार करत आहेत, यावरून भाजपाची अस्वस्थता दिसून येते. ज्यांना त्यांनी भ्रष्ट ठरवून तुरुंगात टाकणार असे जाहीर केले होते ते आता त्यांच्या गोटात सामील झाले आहेत. मोदीजी स्वतः घाबरले आहेत. इंडिया आघाडी त्यांचा पराभव करेल, असे खरगे म्हणाले.

काँग्रेस नेते भाजपामध्ये सामील होण्याचे कारण काय?

मोदीजी घाबरले असतील, तर काँग्रेस नेते भाजपात का सामील होत आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले, हे नवीन नाही. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये फुट पडली तेव्हा सर्वांनी इंदिरा गांधींना सोडले. १९७८ मध्ये दुस-या विभाजनानंतर आम्ही आमचे चिन्ह गमावले. १९८४ मध्ये दिवंगत प्रणव मुखर्जी यांनी स्वतःचा पक्ष (राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस) स्थापन केला आणि काही नेत्यांना स्वतःबरोबर घेतले. पलीकडचे गवत हिरवे दिसू लागले की, लोक आम्हाला सोडून जातात. दुसरीकडे, मोदीजींनी लोकांना घाबरवण्यासाठी सक्तवसुली संचालनालय (ईडी), सीबीआय आणि आयकर या केंद्रीय संस्थांचा वापर केला आहे.

मी ५३ वर्षांपासून एका पक्षात आहे. मी २० वर्षे काँग्रेसच्या राजवटीचा भाग आहे आणि ३० वर्षे विरोधी पक्षात आहे. माझ्यासारखे लोक सोडत नाहीत. सत्तेवर राहून नव्हे तर तत्त्वांवर समाजाची सेवा करणे हे माझे राजकीय ध्येय आहे. हे महात्मा गांधींच्या काळापासून सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनाला पाठिंबा दिला नाही. घाबरलेले लोक पळून जातात. आमचा तळागाळातील कार्यकर्ता पक्षातच आहे. नेता गेला तर काही फरक पडत नाही. बूथ-लेव्हल किंवा ब्लॉक-लेव्हल कार्यकर्ता गेला तर खूप फरक पडतो, पण ते कुठेही गेलेले नाहीत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.

“संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध”

सध्याच्या इंडिया आघाडीतील काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे ज्यावर संपूर्ण जबाबदारी आहे. दक्षिणेत तुमचे मजबूत मित्रपक्ष असले तरी, तुम्हाला उत्तर आणि हिंदी हार्टलँड जिंकावे लागेल. तुम्हाला कोणत्या राज्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. यावर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, उत्तर भारतातील काही भागात, जसे की उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडच्या काही भागात पक्ष कमजोर आहे. पण उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीतील समाजवादी पार्टी (सपा) आणि बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) मजबूत आहेत. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि अगदी आसाममध्येही आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. आम्ही ओडिशात चांगले काम करत आहोत. बंगालमध्ये विविध कारणांमुळे युती होऊ शकली नाही, पण तेथील हिंसाचार आणि मोदींना असलेल्या विरोधामुळे आम्हाला अजूनही आशा आहे. आम्हाला काही जागांचा त्याग करावा लागत आहे. कारण, काँग्रेसने संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे.

“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”

कलम ३७० आणि सीएएवर बोलताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आम्ही अशा मुद्द्यांवर चर्चा करतो. या मुद्द्यांना आम्ही जिंकण्याच्या किंवा हरण्याच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. बेरोजगारी आणि महागाई यासारखे मोठे प्रश्न आहे, ज्यावर पंतप्रधान कधीच बोलत नाहीत. तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी पूर्ण केले का? अगदी आयआयटीयन आणि डॉक्टरांनाही नोकऱ्या मिळत नाहीत. मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले असल्याचा आरोप खरगेंनी केला.

२०१४ मध्ये त्यांनी काळा पैसा परत आणण्याचे आणि प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले आहे का? त्यांनी असे काहीही केलेले नाही. पण यूपीए सरकारने कोणालाही न विचारता अन्न सुरक्षा कायदा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) आणि ग्रामीण आरोग्य अभियान यात बदल केले. आम्ही लोकांना अधिकार दिले आहेत आणि ते रद्द करता येणार नाहीत. आम्ही मोदीजींसारखे नाही, बोलतात एक आणि करतात दुसरे.

“निवडणूक जिंकण्यासाठी अनावश्यक विवाद निर्माण केले जात आहे”

पंतप्रधान नेहमी म्हणतात देशासाठी लढा. आपण स्वातंत्र्यासाठी लढलेले लोक आहोत. तेव्हा कुठे होता स्वयंसेवक संघ किंवा जनसंघ? ते म्हणतात की, संविधान त्यांच्यासाठी गीतेसारखे आहे. पण १४० कोटी लोकांसाठी संविधान म्हणजे गीता, बायबल, कुराण, गुरु ग्रंथ साहिब आणि बरेच काही आहे. नागरिकांचे मूलभूत अधिकार संरक्षित आहेत, भाषण स्वातंत्र्य संरक्षित आहे, शिक्षण संरक्षित आहे, धर्म संविधानाद्वारे संरक्षित आहे, मग त्याबद्दल अनावश्यक विवाद का निर्माण केले जात आहे? केवळ निवडणूक जिंकण्यासाठी?, असा आरोप खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर केला.

“भाजपा लोकांची पिळवणूक करत आहे”

ईडी हा अर्थमंत्र्यांचा विभाग आहे, मग गृहमंत्री अमित शहा यांनी ईडी स्वतःकडे का ठेवले? सहकार मंत्रालय गृहमंत्र्यांकडे का? कारण, त्यांना साखर कारखाने आणि जिल्हा सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवायचे आहे. हा हेतू चुकीचा आहे, असे खरगे म्हणाले. तुम्ही लोकांना त्रास देत आहात, त्यांची पिळवणूक करत आहात. मला वाटले वॉशिंग मशीनमध्ये फक्त कपडे धुतात. मला हे माहित नव्हते की, शहासाहेबांकडे लोकांची साफसफाईदेखील केली जाते. राष्ट्रापेक्षा कोणीही वर नाही. त्यामुळे राष्ट्र वाचवण्यासाठी जे काही आवश्यक असले, ते आम्ही करू, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? महाराष्ट्रातील जनतेच्या काय आहेत भावना?

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, आम्ही खाजगी, सार्वजनिक आणि सहकारी क्षेत्रांना प्रोत्साहन दिले. आम्ही कोणत्याही कॉर्पोरेट किंवा उद्योगपतीच्या विरोधात नाही, जर त्यांनी नियमांचे पालन केले असेल तर. आम्ही उद्योगपतींना पाठिंबा देतो कारण उद्योगाशिवाय तुम्ही संपत्ती किंवा नोकऱ्या निर्माण करू शकत नाही. उच्च उत्पादकतेसाठी आपल्याला मजूर, त्यांचे वेतन, कौशल्य आणि आरोग्य याकडेही लक्ष द्यावे लागेल. आम्ही डावे किंवा उजवे नाही, आम्ही केंद्रवादी आहोत. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गावर चालत आहोत. मागे वळून पाहील्यास तुम्हाला दिसेल की, आमच्या पंचवार्षिक योजना किती फायदेशीर होत्या. आम्ही अनेक उद्योगपतींना पाठिंबा दिला आणि त्यांच्या वाढीला प्रोत्साहन दिले, असे खरगे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mallikarjun kharge on prime minister modi and bjp loksabha rac