प्रबोध देशपांडे

अकोला: जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद वाढली असून पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण केले जात आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्याविरोधात मोहिमच हाती घेतली आहे. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील असंतोषामुळे पक्ष अधिक कमकुवत होत आहे. निवडणुकांमध्ये तिकीट वाटप व आर्थिक व्यवहारांची सूत्रे हाती राहण्यासाठी ही धडपड सुरू असल्याची कुजबुज देखील पक्षात सुरू झाली. या सर्व प्रकारावरून अकोला जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

narendra modi sonia gandhi pti
“मैदान सोडून पळून जाणारे आता…”, पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींना टोला
Amravati, Vanchit Bahujan Aghadi,
अमरावतीत ‘वंचित’मध्‍ये फूट; जिल्‍हाध्‍यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा
Why do Congress leaders join BJP chandrashekhar bawankule clearly talk about it
काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट

अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजी, पक्षांतर्गत खदखद, डावलणे, नाराजी आदी प्रकार काही नवीन नाहीत. त्यामुळेच एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या अकोला जिल्ह्यात काँग्रेस दोन दशकांपासून रसातळाला गेली आहे. १९८९ पासून अकोला लोकसभेत काँग्रेसचा खासदार निवडून आला नाही, तर २००४ पासून जिल्ह्यातून काँग्रेसची विधानसभेवर देखील पाटी कोरीच आहे. जिल्ह्यात काँग्रेसची अक्षरश: वाताहत झाली. तरीही नेते मंळळींना याचे कुठलेही गांभीर्य नाही. काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते गटातटात विभागले आहेत. विरोधकांचा सामना करण्यासाठी पक्ष बळकट करण्याऐवजी शह-काटशहाच्या राजकारणातच ते व्यस्त असतात. आगामी निवडणुकांसाठी इतर पक्ष संघटनात्मक बांधणीवर जोर देत असतांना जिल्हा काँग्रेसमधील नेते मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यातच धन्यता मानत आहेत. याचा प्रत्यय नुकत्याच अकोट येथे झालेल्या बैठकीत आला आहे.

आणखी वाचा-केंद्रीय मंत्र्यांनेच उघडकीस आणला भाजप आमदाराचा प्रताप

सहकार गटासह पक्षातील इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अकोट येथे नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्या विरोधातील अस्वस्थता समोर आली. जिल्हाध्यक्ष संघटनात्मक बांधणीमध्ये विश्वासात घेत नसल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्यात अर्थ नसल्याचा सूर बैठकीत उमटला. जिल्हाध्यक्षांनी कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता नाराज नेते व पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. या सर्व प्रकारासंदर्भात संबंधित नेत्यांशी चर्चा करून आवश्यक ते बदल करण्याची भूमिका जिल्हाध्यक्षांनी घेतली आहे.

लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आपल्या समर्थकांना तिकीट मिळावे, यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असते. गटातटात विभागलेल्या काँग्रेसमध्ये नेहमीच वर्चस्वाची लढाई चालते. त्यातच निवडणुकीतील अर्थकारण देखील मोठा मुद्दा आहे. ते हातात राहिल्यास काही पदाधिकाऱ्यांचे चांगलेच फावते. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर नाराजी नाट्य सुरू असल्याची देखील पक्षामध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. त्या बैठकीत उपस्थित नेत्यांच्या हातात वर्षानुवर्षे पक्षाचे नेतृत्व होते. हिदायत पटेल हे अनेक वर्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांना २०१४ व २०१९ मध्ये पक्षाने लोकसभेचे तिकीटही दिले होते. मात्र, पक्षाच्या कामगिरीत कुठलाही फरक झाला नव्हता. तेव्हा आणि आताही अकोला जिल्ह्यात काँग्रेस केवळ अंतर्गत वादात अडकल्याचे दिसून येते. त्यामागे पक्षातील गटबाजी हे प्रमुख कारण आहे. या सर्व प्रकारातून काँग्रेसचे सातत्याने नुकसान होत असतांनाही त्यातून धडा घेण्यास नेते अद्यापही तयार नाहीत. काँग्रेसच्या दयनीय स्थितीचा लाभ भाजपसह इतर पक्षांना नेहमीच होतो. तेच चित्र यावेळेसही कायम आहे.

आणखी वाचा-कुणबी आरक्षणामुळे ठाणे, पालघरात युतीची कोंडी

लोकसभेवर दावा अन् वाद

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’मध्ये काँग्रेसने अकोल्यावर दावा केला. ॲड. प्रकाश आंबेडकर सोबत येण्यास इच्छूक नसल्यास स्थानिक नेत्यांनी आपणच लढावे, असा आग्रह काँग्रेसच्या वरिष्ठांकडे धरला. मात्र, पक्षांतर्गत एवढे वाद व नाराजी असतांना काँग्रेस अकोल्यातून विजयश्री कसा खेचून आणणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पक्ष संघटन वाढविण्याचे कार्य जोमाने केले. सरकारविरोधात हजारोंचे मोर्चे काढण्यात आले. पक्षात काहींची नाराजी असल्याचे कळले. त्यांच्यांशी व्यक्तिगत चर्चा केली आहे. काँग्रेस निवडणुकांमध्ये प्रभावीपणे कामगिरी करेल. -अशोक अमानकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष, अकोला.