खासदार राहुल गांधी सध्या काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या यात्रेत त्यांनी इंडिया आघाडीतील घटकपक्षांनाही सामील होण्याचे आवाहन केलेले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र आम्ही या यात्रेत जाणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या याच यात्रेवर भाष्य केले आहे. ही यात्रा चुकीच्या वेळी काढण्यात आली असून सध्या राहुल गांधी या यात्रेत नव्हे तर काँग्रेसच्या मुख्यालयात हवे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मोठं युद्ध जिंकण्यासाठी लढाईत पराभव स्वीकारला”

प्रशांत किशोर हे इंडियन एक्स्प्रेसच्या एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही भाष्य केले. त्यांनी नुकतेच इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपाप्रणित एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला नसता, तर भाजपाने बिहारमध्ये या लोकसभा निवडणुकीत अधिक जागा लढवल्या असत्या. कदाचित गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यांनी अधिक जागांवर विजयही मिळवला असता. मात्र त्यांनी मोठे युद्ध जिंकण्यासाठी तुलनेने लहान लढाईत पराभूत होणे पसंद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा हा पक्ष अजिंक्य नाही. भाजपाला पराभूत करता येऊ शकते. मात्र भाजपाला मागे टाकण्यासाठी ज्या-ज्या संधी मिळाल्या होत्या, त्या विरोधकांनी गमावल्या, असे प्रशांत किशोर म्हणाले.

“राहुल गांधी सध्या मुख्यालयात हवे होते”

लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असे असताना राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढणे योग्य नाही. राहुल गांधींचा हा सर्वांत वाईट निर्णय आहे, असेही मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले. “जेव्हा सैन्य युद्ध करत असते तेव्हा सैन्याचा कमांडर हा मुख्यालय सोडत नसतो. आता राहुल गांधी हे मणिपूर नव्हे तर मुख्यालयात हवे होते,” असे प्रशांत किशोर म्हणाले.

“दोन वर्षांपूर्वीच एकत्र यायला हवे होते”

विरोधकांनी केलेल्या इंडिया आघाडीची वेळ योग्य नाही, असेही मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले. ‘लोकसभेची निवडणूक अवघ्या ९ महिन्यांवर आलेली असताना विरोधक एकत्र आले. या पक्षांना एकत्र यायचेच होते, तर कमीत कमी दोन वर्षांपूर्वी त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता,’ असे प्रशांत किशोर म्हणाले .

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor said rahul gandhi bharat jodo nyay yatra and india alliance on wrong time prd
Show comments