चांगल्या रस्त्यांवर डांबर आणि पदपथांचा सपाटा; नगरसेवकांमध्ये श्रेयासाठी चढाओढ निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड शहरात जागोजागी विकासकामे सुरू झाली आहेत. चांगल्या रस्त्यांवर डांबर पडू लागले असून, सुस्थितीत असलेल्या पदपथांची विनाकारण दुरुस्ती काढण्यात आली आहे. नव्याने ब्लॉक बसवण्याची तत्परताही दाखवण्यात येत आहे. पूर्वीचे आणि आताचे प्रभागाचे क्षेत्र बदलले असल्याने व येत्या निवडणुकीत अनेक नगरसेवक आमने-सामने येत असल्याने विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी नगरसेवकांमध्ये कमालीची चढाओढ आहे.िपपरी महापालिकेच्या निवडणुकांना जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी राहिलेला आहे. निवडणुकांच्या तोंडावर प्रभागातील विकासकामे पूर्ण झाल्याचा देखावा उभा करण्यासाठी नगरसेवकांचा आटापिटा सुरू आहे. पाच वर्षे नगरसेवकांनी काहीही केले नाही. प्रभागात ते फिरकले नाहीत. रस्ते उखडलेले आहेत. जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत. अशा तक्रारी प्रभागांमध्ये होत्या. त्याकडे लक्ष दिले नाही, मात्र निवडणुका जवळ आल्याने नगरसेवकांमधील कार्यक्षमता उफाळून आली आहे. अनेक नगरसेवक अधिकाऱ्यांच्या मागे हात धुऊन लागले आहेत. काहीही करा आणि कसेही करा, प्रभागातील कामे सुरू करा, असा आग्रह नगरसेवक धरू लागल्याने शहरभरात विकासकामे सुरू झाल्याचे चित्र पुढे आले आहे. रस्ते चांगले असूनही त्यावर डांबर पडले आहे. जे पदपथ आणखी काही वर्षे टिकू शकले असते, त्यांचीही दुरुस्ती करण्यात येत आहे. काही ठिकाणी आवश्यकता नसताना नव्याने पदपथ करून त्यावर आकर्षक ब्लॉक टाकण्यात आले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपली की या कामांना आणखी जोर चढणार आहे. नव्या प्रभागरचनेनुसार किमान सात ते आठ नगरसेवक एकाच प्रभागात येत आहेत, त्यामुळे आधीच्या प्रभागांमध्ये केलेले काम आपणच केल्याचा दावा नगरसेवकांकडून होतो आहे. मतदारांवर छाप पाडण्याच्या नादात श्रेयासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येते.