गेले २ दिवस पडत असलेल्या पावसाचा फटका संपूर्ण राज्याला बसताना दिसतो आहे. मुंबई आणि उपनगरांत पावसाची संततधार सुरु असून काल सकाळपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. ठाणे, रायगड, पेण या परिसरातही पावसाने थैमान घातले आहे. याशिवाय पिंपरी चिंचवड भागात अनेक ठिकाणी पाणी साठले असून जनजीवनावर परिणाम झाला आहे. पुण्यातील ताडीवाला रोड जवळील वसाहतीमध्ये पाणी शिरले आहे. तसेच, सततच्या पावसाचा फटका पुण्यातील येरवडा शांतीनगर भागाला बसला असून वसाहतीमध्ये पाणी शिरले आहे. तशातच सततच्या पावसामुळे खडकवासला धरणातून सध्या अकरा वाजल्यापासून ३५ हजार ५७४ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू असल्यामुळे पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली आहेत. दोन्ही धरणातून अनुक्रमे १२ हजार ९३६ आणि ९ हजार ०३५ असा विसर्ग सुरु आहे. तसेच पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये वाढलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुपारी तीन वाजता खडकवासला धरणातून एकूण ४१ हजार ७५६ क्युसेक इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.