पिंपरी पालिका आयुक्तांची चिंता

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा वेग एकीकडे वाढत असतानाच शहरातील अनेक उद्योग शहराबाहेर जात आहेत, अशी चिंता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केली आहे. शहराच्या सर्व समस्यांचा विचार करून त्या सोडवण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शहर विकासाचे धोरण व शहर परिवर्तन आराखडा या विषयी आयोजित चर्चासत्रात आयुक्त बोलत होते. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांच्यासह शहरातील अनेक संस्थांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, कष्टकरी कामगारांच्या मेहनतीतून हे शहर उभे राहिले आहे. राज्यातील विविध प्रांतांतून आलेल्या नागरिकांचे या शहरात वास्तव्य आहे. दोन दशकांत वेगाने वाढणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. सध्या शहर विकासाचा दर ७० टक्के इतका असून तो इतर शहरांपेक्षा जास्त आहे. बदलत्या काळात शहरातील अनेक उद्योग शहराबाहेर जात आहेत. उद्योगांच्या त्या जागांवर मोठे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. रहिवासी क्षेत्र वाढू लागल्याने आता रहिवासी शहर म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख निर्माण होत आहे.  झोपडपट्टय़ा, अनधिकृत बांधकामे, आरोग्य, शिक्षण आदी समस्याही भेडसावत आहेत. त्या सोडवण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करण्याची गरज आहे. लोकसहभागातून सर्वसमावेश तसेच शाश्वत प्रगती करून २०३० पर्यंत पिंपरी-चिंचवड शहर हे देशातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनवण्याचे ध्येय आहे. त्यासाठी सर्वाचे सहकार्य अपेक्षित असून काही सूचना असल्यास नागरिकांनी पालिकेला कळवाव्यात, असे आवाहन आयुक्तांनी या वेळी केले आहे.