लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राज्यात पुढील दोन दिवस किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पीयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव कमजोर पडल्यामुळे राज्यात पुढील दोन दिवस किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून किमान तापमान होत असलेली घट थांबेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आणखी वाचा- पिंपरी- चिंचवड: ‘त्या’ नऊ निष्पाप जीवांचा बळी कुणी घेतला? पोलीस की महानगरपालिका..!
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसापासून राज्याच्या बहुतेक भागात किमान तापमानात झपाट्याने घट होत होती. किमान तापमान सरासरी दोन ते चार अंश सेल्सिअसने घट झाल्यामुळे राज्यभरात हवेत गारवा जाणवत होता. उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेच्या प्रवाहामुळे तापमानात घट होत होती. आता उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा प्रवाह कमजोर पडला आहे. तसेच दक्षिणेकडून किंवा आग्नेयकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हवेत आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यभरात हवामान कोरडे राहणार असले तरीही किमान तापमानाचा पारा खाली जाणार नाही. तापमान स्थिर राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.