मराठीत ‘पुढच्यास ठेस आणि मागचा शहाणा’ अशी म्हण आहे. मात्र आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांच्या घटना बघितल्या, तर पुण्यातील परिस्थिती ‘पुढच्यास ठेस आणि मागच्यालाही ठेच’ अशी असल्याचे सहजच स्पष्ट होते. छोटय़ा आर्थिक गुंतवणुकीत मोठी कमाई करा, असे आमिष गुंतवणूकदारांना दाखवायचे, त्यासाठी काही ना काही योजना जाहीर करायच्या, जाहीर केल्याप्रमाणे सुरुवातीचे दोन-चार महिने गुंतवणूकदारांना व्याज किंवा अन्य रुपाने परतावा द्यायचा आणि भरभक्कम कमाई झाली की गाशा गुंडाळून पसार व्हायचे असे प्रकार पुण्यात सातत्याने घडत आहेत. गेल्या एका वर्षांत पुणे शहरात आर्थिक फसवणुकीचे तब्बल ७५० आणि आर्थिक अपहाराच्या प्रकरणांचे ६५ गुन्हे पोलिसांकडे दाखल झाले आहेत.
‘समृद्ध जीवन’ हे गुंतवणुकीच्या फसवणुकीचे पुण्यातील ठळक उदाहरण. या प्रकरणात ‘समृद्ध जीवन’सह महेश मोतेवार आणि आणखी तीन जणांवर डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेने घेतलेल्या गुंतवणूक प्रकरणी ‘सेबी’ (रोखे व प्रतिभूती विनिमय मंडळ) कडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेबीने मोतेवार यांच्या कंपनीला ३१ ऑक्टोबर २०१३ मध्ये एक नोटीस बजावली होती. त्यानुसार कंपनीला गुंतवणूक घेण्यावर र्निबध घालण्यात आले होते. ‘कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम’च्या माध्यमातून समृद्ध जीवन कंपनी नागरिकांकडून आर्थिक गुंतवणूक व ठेवी घेत होती. अशा प्रकारची गुंतवणूक घेण्यासाठी सेबीच्या परवानगीची गरज असते. मात्र, कंपनीने कोणतीही परवानगी घेतली नव्हती. सेबीने गुंतवणूक घेण्यास र्निबध घातल्यानंतरही कंपनीने गुंतवणुकी घेणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे सेबीकडून कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीदरम्यान कंपनीचे लेखापरीक्षण व हिशोबाच्या फायली ताब्यात घेतल्या होत्या. त्या वेळी आदेशाचे उल्लंघन करून कंपनीने नागरिकांकडून गुंतवणूक सुरूच ठेवल्याचे कागदपत्रांच्या तपासणीत उघड झाले. त्यामुळे सेबीने स्वत:हून याप्रकरणी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला.
तळेगाव शेअर मार्केट
पुण्याजवळील तळेगाव ढमढेरे येथील शेअर मार्केट हे अशा प्रकारच्या फसवणुकीचे एक मोठे उदाहरण आहे. या शेअर बाजाराच्या कथित संचालकांनी पुणे शहर आणि जिल्ह्य़ात त्यांच्या प्रतिनिधींचे मोठे जाळे निर्माण केले होते. मगरपट्टासारख्या उच्चभ्रू भागात या शेअर बाजाराचे कार्यालय होते. सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांसह शेकडो शासकीय उच्चपदस्थ अधिकारी, पोलीस अधिकारी यांचीही गुंतवणूक या शेअर बाजारात होती. कालांतराने या शेअर बाजाराचा बाजार उठला. मात्र तोपर्यंत हजारो जणांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक झालेली होती. फसवणुकीची व्याप्ती मोठी असली, तरी प्रत्यक्षात पोलिसांकडे आलेल्या तक्रारी मात्र जेमतेम पंधरा-वीसच होत्या. ‘आर्यरुप’ या वित्तिय संस्थेतही पुणेकरांनी अशाच प्रकारे मोठी गुंतवणूक केली होती.  कालांतराने व्याज आणि रकमेचा परतावा संस्था देईनाशी झाली आणि हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे उघड होताच शेकडो गुंतवणूकदारांना धक्का बसला.