राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचा भ्रष्ट कारभार आणि केंद्रातील मोदी सरकारची शेतकरीविरोधी धोरणे याला जनता वैतागली असून शेतकरी संघटना आगामी विधानसभा निवडणुकीत तिसरा पर्याय देणार आहे.
शेतकरी कामगार पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र लोकशाही आघाडी या समविचारी पक्षांशी संघटनेची चर्चा सुरू आहे. राज्यातील सर्व २८८ जागांवर उमेदवार उभे करून समर्थ तिसरा पर्याय देणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधामध्येही शेतकरी संघटनेचे उमेदवार असतील. राज्यातील आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारे २० प्रश्न संघटनेने सत्ताधाऱ्यांना विचारले आहेत. कांदा निर्यातीवर बंदी घालून मोदी सरकारने आपली धोरणे शेतकरीविरोधी असतील, याचा दाखला दिला आहे. कांदा, बटाटा या जीवनावश्यक वस्तू असतील, तर शेतक ऱ्याला योग्य हमी भाव दिला पाहिजे, ही आमची मागणी असल्याचेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.