चालू वर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपीक, फळपिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाच कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी तीन कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे वाटप सुरू करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे ९१९२ शेतकऱ्यांच्या २२४७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तीन कोटी १८ लाख रुपये, शेतजमीन नुकसानीसाठी १५ लाख रुपये, मृत जनावरांसाठी ७४ लाख रुपये, पूर्णतः नष्ट, पडझड, कच्ची-पक्की घरे, झोपड्या आणि गोठ्यांसाठी एक कोटी २० लाख रुपये अशा एकूण पाच कोटी २८ लाख रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यापैकी तीन कोटी १८ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्याचे वितरण स्थानिक पातळीवर केले जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> पुणे : दहीहंडी उत्सवात गोळीबार ; गुंड टोळीवर मोक्का कारवाई

२९ कोटी ५२ लाख ४७ हजार १५ रुपयांचा निधी लाल फितीत अडकला
अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर अशा विविध कारणांनी नुकसान झालेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित जिल्ह्यातील बाधित नागिरकांना नुकसानीपोटी द्यायचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. मात्र, हा निधी अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्तच झालेले नाही. गेल्या तीन वर्षांपासूनचा तब्बल २९ कोटी ५२ लाख ४७ हजार १५ रुपयांचा निधी लाल फितीत अडकला आहे. या अडकलेल्या निधीमध्ये सन २०१९ मध्ये २५ सप्टेंबर रोजी शहरात झालेला ढगफुटीसदृश पावसामुळे झालेले नुकसान भरपाई, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये शेतीपिक नुकसान, तौक्ते चक्रीवादळ, ऑक्टोबर २०२१ मधील अतिवृष्टी आणि डिसेंबर २०२१ मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश आहे. या सर्व नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाकडे वेळोवेळी अहवाल पाठविण्यात आले. मात्र, त्यातील काही निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.