पुणे : लहान मुलांना वर्षभर ‘फ्लू’चा धोका असतो. हिवाळा आणि पावसाळय़ापूर्वी हा धोका अधिक असतो. त्यामुळे इन्फ्लूएन्झाची लस मुलांना देणे आवश्यक असल्याचे इंडियन अॅकॅडमी ऑफ पीडिअॅट्रिक्सतर्फे (आयएपी) स्पष्ट करण्यात आले आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी मुलांचे लसीकरण पूर्ण करावे. त्यामुळे इन्फ्लूएन्झाच्या प्रसारास पोषक वातावरण तयार होण्यापूर्वी मुलांच्या शरीरात या आजाराविरुद्ध संरक्षण तयार होईल, असेही आयएपीकडून सांगण्यात आले आहे. सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना इन्फ्लूएन्झाची लस देण्याच्या सूचना बालरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहेत. लहान मुलांना होणारा इन्फ्लूएन्झाचा संसर्ग अनेकदा काही गुंतागुंत निर्माण करण्याची शक्यता असते. ही लस दरवर्षी अद्ययावत होत असल्याने ती घेणे तब्बल वर्षभर मुलांना फ्लूपासून संरक्षण देते. इन्फ्लूएन्झा विषाणू संसर्गामुळे फ्लू (ताप), नाक, घसा आणि फुप्फुसांना संसर्ग होतो. थंडी वाजणे, ताप येणे, घसा दुखणे, खवखवणे, हात-पाय-डोके दुखणे, थकवा ही इन्फ्लूएन्झाची लक्षणे आहेत. मोठय़ा माणसांमध्ये इन्फ्लूएन्झा काही दिवसांत बरा होतो. मात्र, लहान मुलांमध्ये फ्लूचे रूपांतर न्युमोनिया, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे अशा गोष्टींतही होऊ शकते. त्यामुळे लशीचे संरक्षण उपयुक्त ठरते. सूर्या मदर अॅण्ड चाइल्ड रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन शाह म्हणाले, काही वेळा मुलांमधील इन्फ्लूएन्झासारख्या संसर्गातून गंभीर गुंतागुंत निर्माण झालेली पाहायला मिळते. असा धोका टाळण्यासाठी सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना अशी लस देणे अत्यावश्यक आहे. इन्फ्लूएन्झा विषाणूचे चार प्रकार असतात. त्यात सतत बदल होत असतात. त्यामुळे दरवर्षी कोणत्या प्रकारचा विषाणू आजार पसरवण्यास कारणीभूत ठरतो हे पाहून लशीमध्ये बदल केले जातात. त्यामुळे दरवर्षी ही लस अधिकाधिक सुरक्षित होत जाते.