मी चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. परंतु, चहापानावर एवढा खर्च होतो, याची कल्पना नव्हती, अशा शब्दात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला खोचक शब्दांमध्ये टोला लगावला.

विधिमंडळाचे अधिवेशन संपतानाच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री कार्यालयात चहापानात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीवरून त्यांनी हा आरोप केला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने खुलासाही प्रसिद्ध केला आहे. मात्र, हा विषय सध्या चांगलाच चर्चेत असून पुण्यात आलेल्या पवारांनीही भाषणात राज्य सरकारला टोला लगावला.  पवार म्हणाले, प्रशासकीय खर्च कमी करून जेथे पिढी घडवायची आहे, अशा ठिकाणी खर्च करण्याची तयारी शासनाने दाखवली पाहिजे.