– चैतन्य प्रेम

सत्ययुगात मनात विपरीत विचार आला तरी त्याचा दु:खभोग भोगावा लागत होता. कलियुगात भगवंतानं मोठी सवलत दिली आहे. या युगात मनात सत्कर्माचा विचार जरी आला, पण कृती घडली नाही, तरी त्याचं पुण्य लाभतं. याउलट मनात वाईट विचार आले, पण कृती घडली नाही, तरी त्याचं पाप नाही! याचं कारण भोवतालची परिस्थितीच अशी आहे की मनात सद्विचार येऊच नयेत, कुविचारच यावेत. त्यामुळे अशा परिस्थितीतही सद्विचार मनात आला तरी त्याचं पुण्य लाभतं, मग प्रत्यक्ष कृती घडली नाही तरी चालते. म्हणजे ‘सहस्रभोजन घालावं’ अशी तळमळीची इच्छा मनात आली तरी ते सहस्रभोजन घातल्याचं पुण्य लाभतं बरं. आता हे वाचून मनात विचार आणून उपयोग नाही! अगदी अंत:करणात तो विचार सहज तीव्रपणे आला पाहिजे. त्याच वेळी परिस्थितीवशात कुविचारच मनात येणं स्वाभाविक असल्यानं जोवर त्याला अनुसरून कृती घडत नसेल तर नुसता तो विचार मनात आल्यानं आपल्या वाटय़ाला दु:खभोग येत नाहीत. तेव्हा आपल्या मनात कामनिक विचार येतात एवढय़ानं खचून जाऊ नये. पण त्याचबरोबर दोन गोष्टी मात्र अगदी स्पष्ट लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे, नुसते मायिक विचार मनात आल्यानं दु:खभोग वाटय़ाला येत नसले तरी प्रत्येक विचारात जो हवेपणाचा भाव असतो तो संकल्पच मानला जातो. तो संकल्प मात्र चिकटतो आणि तो पूर्ण होईपर्यंत पुन:पुन्हा या जगात परतावं लागतं. दुसरी गोष्ट अशी की, मनात कुविचार आला, पण कृती घडली नाही, तर दु:खभोग नाही- एवढय़ावर समाधान मानण्यात अर्थ नाही. कारण जो विचार वारंवार मनात घोळत राहतो त्यानुरूप कधी ना कधी कृती घडल्याशिवाय राहत नाही. तसंच भगवंतानं दिलेली ही सवलत म्हणजे मनात कुविचार घोळवण्याची परवानगी नव्हे. मनाचा कुविचाराकडे असलेला ओढा सद्विचाराकडे वळवणं हाच आपला प्रयत्न हवा. ‘श्रीनारद भक्तिसूत्रा’त म्हटलं आहे की, ‘‘तरंगायिता अपीमे संगात्समुद्रायती’’ (सूत्र ४५). म्हणजे विकार प्रथम तरंगांप्रमाणे सूक्ष्म असतात, पण त्यांना पूरक आणि पोषक असा संग मिळाला तर ते समुद्राप्रमाणे विराट होत जातात. तरंगांचा धोका कमी असतो, पण समुद्र हा भीषण रूप धारण करू शकतो. तो तरून जाणं कठीण असतं. तेव्हा अंग-संगतीच्या ओढीनं जीव कसा बंधनात सापडतो, हे ‘हत्ती’च्या उदाहरणावरून अवधूत शिकला. त्यामुळे तो त्याचा १५ वा गुरू ठरला. त्यानंतरचा १६ वा गुरू म्हणजे हरिण. नादाला भुलून हरिण जसं जाळ्यात अडकतं तसंच भक्तीपासून दूर असलेलं कामुक गाणंबजावणं ऐकणं माणसाला अधिकच बहिर्मुख करतं. त्याला जाळ्यात अडकवतं. हे हरिणाच्या उदाहरणानं जाणवलं. त्यानंतरचा १७ वा गुरू म्हणजे मासा. अवधूत सांगतो, ‘‘मीन गुरू करणें। तेंही अवधारा लक्षणें। रसनेचेनि लोलुप्यपणें। जीवेंप्राणें जातसे।।१७०।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे, केवळ जिभेला- म्हणजे जिव्हालोलुप्याला वश होऊन मासा आमिषाच्या ओढीने गळाला लागतो आणि प्राणास मुकतो, हे माशाच्या निमित्तानं शिकता आलं. त्यामुळे मासा हा गुरू झाला आहे.

chaitanyprem@gmail.com