जगदीश काबरे

‘सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना मारहाण’ तसेच ‘वाशिम जिल्ह्यातील शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले’ या बातम्या वाचून आपण खरोखरच पुरोगामी महाराष्ट्रात राहत आहोत का हा प्रश्न पडतो. आतापर्यंत समाजसुधारकांवर या महाराष्ट्रात अनेकदा हल्ले होत आलेले आहेत, तरीही आपण कोणत्या तोंडाने महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो हा प्रश्न पुनःपुन्हा पडतो. हेरंब कुलकर्णी यांनी करोना काळात विधवा झालेल्या स्त्रियांना अधिकार मिळावा आणि सन्मानाने जगता यावे यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यांच्या या कामाची दखल देश पातळीवरही घेतली गेली होती. हेरंब कुलकर्णी हे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात. ते स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजींचे अनुयायी आणि गांधीवादी विचारांचे हाडाचे शिक्षक आहेत. त्यांनी स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. विद्यार्थी शाळाबाह्य का होतात याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला आणि ‘शाळा आहे, पण शिक्षण नाही…’, ‘आमच्या शिक्षणाचे काय?’ यासारखी आजच्या शिक्षण पद्धतीवर टीका करणारी पण जागृत करणारी पुस्तके लिहिली आहेत. दारूच्या व्यसनामुळे लोकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ते कार्यरत असतात. आता ते ज्या शाळेत मुख्याध्यापक आहेत, त्या शाळेतील मुले व्यसनापासून लांब रहावीत म्हणून परिसरातील गुटखा, तंबाखू विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांनी ती दुकाने त्या परिसरातून हटवावीत यासाठी नगरपालिकेला अर्ज दिला होता. परिणामी या पानटपऱ्या आणि गुटखा विक्री करणारी दुकाने बंद झाली. याबद्दल जागरूक नागरिक म्हणून खरंतर त्यांचा सत्कार व्हायला हवा होता. पण उलट तंबाखू, गुटखा विक्रेते मुजोर होऊन हेरंब कुलकर्णीवरच हल्ला झाला. यात वेगवेगळे हितसंबंध आहेत, म्हणून पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करायलाही टाळाटाळ केली असेल काय? अपराध्यांना जिथे सहजपणे जामीन मिळतो, तिथे आरोपींना पकडायची कुणाला घाई असणार म्हणा!

Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह

राजकीय अस्थैर्य असते, प्रमुख राज्यकर्त्यांमध्येच समन्वय नसतो तेव्हा प्रशासनच फक्त तात्कालिक आदेशांची अंमलबजावणी करते. स्वतःच्या डोक्याने विचार करण्याऐवजी मंत्र्यांच्या बोळ्याने दूध पिण्यात धान्यता मानली जाते. परिणामी ते आपल्या कर्तव्याबाबत बेफिकीर होते. हेरंब कुलकर्णी प्रकरणात याचेच प्रतिबिंब दिसते.

“मला मारहाण करण्याची घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली, त्यानंतर मी पोलिस ठाण्यात गेल्यावर मला चार तास जखमी अवस्थेतच बसवून ठेवले. दुसऱ्या दिवशी पंचनामा व जबाबासाठी गेल्यावरही दोन तास थांबवले. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांनी हल्ल्याचा निषेध करणारे निवेदन दिल्यावर, !तुम्ही कोणीतरी वेगळे असल्याचे व मोठे असल्याचे आधी सांगायचे ना राव…’ अशा शब्दात पोलिसच माझ्यावर डाफरले”. हेरंब कुलकर्णी यांचे हे वक्तव्य वाचल्यावर आपल्याला स्वच्छपणे असे लक्षात येते की, कोणी मोठा माणूस असेल तरच पोलीस त्यात लक्ष घालणार. सामान्य माणसे मात्र किड्यामुंग्यांसारखी मेली तरी त्याची ते दखल घेणार नाहीत, अशी एकंदरीत पोलीस प्रशासनाची वृत्ती झालेली आहे. गेल्या काही वर्षात राज्याची सुव्यवस्था आणि शासन व्यवस्था मोडकळीस आलेली आहे, हे यावरून स्पष्ट होते. वरपर्यंत हितसंबंध आणि लागेबांधे आहेत त्यांनी कितीही गुन्हे केले, ते कितीही बेताल वागले, बाष्कळ आणि द्वेषपूर्ण बरळले तरी ते निर्भयपणे फिरू शकतात. पण समाज सुधारण्यासाठी धडपडणारे, लोकांनी चिकित्सक व्हावे म्हणून प्रबोधन करणारे यांच्यावरच बेधडकपणे हल्ले केले जातात. ही समाजकंटक वृत्ती खरंच पुरोगामी म्हणावल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला लांछनास्पद आहे.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या हल्ल्याबद्दल समाज माध्यमातून स्वतःला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने शंका व्यक्त करण्याचा विकृतपणा केला. संबंधित स्त्रीचे असे म्हणणे होते की, हेरंब कुलकर्णीना लोखंडी रॉडने मारहाण झाली असेल तर रक्ताचे डाग दिसायला हवे होते. रक्ताचे डाग नाहीत, तर मग त्यांना मारहाण झाली हे कशावरून? कोणत्याही मेडिकलच्या दुकानातून विकत घेऊन डोक्यावर अशी पट्टी लावता येते.’ अशी शंका व्यक्त करणारे खरंच सुसंस्कृत आहेत का, असा प्रश्न पडतो. एखाद्यावर हल्ला झाला असेल, तर तो सिद्ध करायला रक्तच वहायला हवं का? सुसंस्कृत माणसांच्या मनामध्ये कुणाबद्दलही असा विचार चुकूनही मनात येत नाही. पण तसे नसणारे आपली विकृती जाहीर करताना जराही कचरत नाहीत. अशा ट्रोलकरांची सध्या सद्दी वाढलेली आहे. कारण त्यांच्यावर कोणतीही कारवाई प्रशासनाने केल्याचे लोकांना दिसलेले नाही. एकंदरीत त्यांना आतून फूस आहे की ते सरकार पुरस्कृत आहेत की काय अशी शंका येते.

अशा घटना सातत्याने घडतात तेव्हा शासन आणि कायदा, त्याचे रक्षक अस्तित्वात आहेत की नाही हा प्रश्न पडतो. गृहमंत्री अशा वेळेला मिठाची गुळणी घेऊन गप्प बसलेले असतात. अगदीच दबाव वाढला तर काहीतरी थातूर-मातूर कारवाईचे गुळमुळीत आदेश देतात. आता वेळ आलेली आहे प्रगतिशील माणसांनी एकत्र येऊन संघटित लढा देण्याची. पुरोगामी मंडळींनी आतातरी क्षुल्लक वैयक्तिक वैमनस्य, मतभेद, कुरबुरी विसरून, एकत्र येऊन एकाच ध्येयासाठी सर्वशक्तीनिशी झटायला हवे. महात्मा गांधी ते दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्यापर्यंत अनेक सुधारकांनी अशा हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. न्यायाधीश लोयांपासून ते कैदेत असलेल्या संजीव भटसारख्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी या प्रवृत्तीची किंमत मोजली आहे. काळ आधीच सोकावलाय. आता आपण जागे झालो नाहीत, तर समाज आणि देश यांचे काही खरे नाही. तेव्हा आता सजग नागरिकांनी निर्भयपणे आले पाहिजे. सरकारवर दबाव आणला पाहिजे. अशी समाजविघातक कृत्ये करणाऱ्यांनावर कारवाई करण्यास सरकारला भाग पाडले पाहिजे. तरच पुढची पिढी सुरक्षितपणे श्वास घेऊ शकेल.

jetjagdish@gmail.com