|| प्रसेनजीत इंगळे,  विरार

अर्नाळा किल्ला गावातील नावाडय़ांची अजब प्रथा

महिलांना ५० टक्के आरक्षण आणि इतर अनेक सवलतींचा वर्षांव सुरू असताना वसईत मात्र महिलांना एका विचित्र प्रथेमुळे आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे. अर्नाळा किल्ल्यात जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो. या गावात प्रवासासाठी केवळ फेरी बोट हा एकमेव पर्याय आहे, पण या फेरी बोटीत केवळ महिलांकडून प्रवासभाडे घेतले जाते. तर गावातील पुरुष मंडळी फुकट प्रवास करतात. असे का? याचे उत्तर मात्र कुणाकडे नाही आहे. परंपरागत ही प्रथा चालू आहे आणि आजही ही प्रथा तशीच सुरू आहे.

अर्नाळा किल्ला गावात तीन-साडेतीनच्या जवळपास लोकसंख्या आहे. हे गाव समुद्रातील एक बेट असून येथे प्रवासाठी केवळ फेरी बोट हे एकमेव साधन आहे. दुसरे कोणतेही साधन या गावात प्रवासासाठी नाही आहे. सध्या या ठिकाणी ठेका पद्धतीने दोनच प्रवासी वाहतूक बोट आहे. ही बोट कंत्राटी पद्धतीने मेरीटाइम बोर्डाच्या नियमानुसार चालवली जाते. आणि त्याचे प्रवासी भाडे हेसुद्धा मेरीटाइम बोर्डने ठरविले आहे, पण यात गावाच्या या अजब प्रथेनुसार केवळ गावातील महिलांना प्रवासासाठी पैसे मोजावे लागतात.

या संदर्भात गावात माहिती घेतली असता गावकऱ्यांनी सांगितले की, ही गावाची परंपरा आहे आणि किती वर्षांपासून सुरू आहे याची कोणतीही माहिती नाही. पुरुष मासेमारी करतात आणि आणीबाणीच्या प्रसंगाच्या वेळी धावून येतात. तर महिला पुरुषांनी मासेमारी करून आणलेले मासे विक्रीसाठी नेतात. त्यामुळे घराचे संपूर्ण अर्थकारण त्यांच्याकडे असते. म्हणून महिलांकडून पैसे घेतले जातात, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

अर्नाळा किल्ला गावाची अजब प्रथा

या गावातील महिलासुद्धा या प्रथेच्या विरोधात जात नाहीत. केवळ परंपरागत रीत असल्याने त्या निमूटपणे पालन करतात. सध्या गावातील परिस्थिती बदलली आहे. महिलांना सतत कोणत्या न कोणत्या कामासाठी शहरात जावे लागते. मुलांना शाळेत सोडणे असेल, भाजीपाला, शिक्षण, नोकरी या कामी महिलांना प्रवास करावा लागत आहे. प्रयेक वेळेस त्यांना १० रुपये प्रवासासाठी मोजावे लागतात. मात्र पुरुषांना एक नया पैसाही द्यावा लागत नाही.

स्त्री-पुरुष समानतेचे धडे गल्लोगल्लीतून दिले जात आहेत, पण केवळ परंपरेच्या नावाखाली महिलांना असमानतेची वागणूक दिली जात असल्याचे उदाहरण आहे. अर्नाळा किल्ला हे पर्यटनस्थळ आहे. हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. मात्र गावाबाहेरील कुणी महिला पुरुष असेल तर मात्र तिकिटाचे पैसे घेतले जातात.

‘आमच्या गावातील सर्व आर्थिक व्यवहार हा महिलांच्या हाती आहे, ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे. महिलांकडे पैसे असतात म्हणून फक्त महिला प्रवासभाडे देतात. परंपरागत प्रथा असल्याने नाइलाजास्तव आम्हाला तोटा सहन करून व्यवसाय करावा लागत आहे.’     – चंद्रकांत मेहेर – ठेकेदार मेरीटाइम  बोर्ड

‘ही प्रथा गावाची प्रथा आहे, आणि कधीपासून सुरू झाली याची कुणालाही माहिती नाही. पण परंपरा म्हणून आम्ही सर्वजण याचे पालन करतो.’ आनंद मेहेर      – स्थानिक रहिवासी

‘आमचे पुरुष हे समुद्रात खोल जाऊन मासेमारी करतात, वेळ प्रसंगी धाऊन जातात पुरुषांनी कमावलेले मासे विकून आम्ही पैसा मिळवतो, त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार महिलांकडे असतात. त्यामुळे या प्रथेचे आम्हाला काहीही वाटत नाही.’           – वनिता वैती – स्थानिक रहिवासी