कॉसमॉस उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सूरज परमार यांनी आत्महत्येपूर्वी काही महिने आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाणे महापालिकेतील ठरावीक नगरसेवक आणि शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीचा पाढा एका पत्राद्वारे वाचला होता, अशी माहिती पुढे येत आहे.
परमारच नव्हे तर ठाणे शहरातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही ठराविक नगरसेवकांच्या गटाला आवर घालावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. केंद्रातील एका वरिष्ठ मंत्र्यानेही परमार यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांना कळविले होते. दरम्यान, या पत्रात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही स्वरूपाचा सविस्तर तपशील नव्हता. त्यामुळे या पत्रावर तात्काळ चौकशीचे आदेश न देता ते नगरविकास विभागाच्या माहितीसाठी वर्ग करण्यात आले होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी इंडियन एक्स्प्रेससोबत बोलताना दिली.