दोन जखमी; हल्लेखोरांमध्ये २० जणांचा समावेश

वसई : परराज्यात जाण्यासाठी असलेला अर्ज भरण्याच्या वादातून नालासोपारा येथील निर्मळ गावात एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे. यात दोन जण जखमी झाले आहेत. कळंब गावातील १५ ते २० जणांनी फिर्यादीच्या बंगल्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

नालासोपारा पश्चिमेच्या निर्मळ गावात राहणारे ब्रिजेश चौहान (३०) हे मुंबईत भाजीविक्रीचा व्यवसाय करतात तसेच ते गावात सामाजिक कार्य करतात. गावातील काही उत्तर भारतीय नागरिकांना ते परराज्यात जाण्याचे अर्ज भरून देण्यास मदत करत होते. सोमवारी गावातील दर्शन घरत याने त्याच्या माणसांचा अर्ज आधी भरण्यास सांगितले. मात्र ब्रिजेशने त्यांना उद्या येण्यास सांगितले.

त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी दर्शन घरत आणि त्याच्या १५ ते २० साथीदारांनी चौहान यांच्या बंगल्यावर लाठय़ा, दगड आणि सळई घेऊन हल्ला केल्याचा आरोप चौहान यांनी केला आहे. या हल्लय़ात ब्रिजेश चौहान यांची पत्नी आणि मुलगा जखमी झाला आहे. जमावाने बंगल्याच्या काचा फोडून दगडांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वसई पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली.

वसई पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात मारहाण केल्याप्रकरणी कलम ३२३, ३२४ तसेच आपत्ती व्यवस्थापन आदेश भंग केल्याप्रकरम्णी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली. या प्रकरम्णी एका आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.