वसईतील मच्छीमारांचा यंदाचा मौसम कोरडा सागरी प्रदूषण व सागरावरील अतिक्रमणाने निर्माण झालेल्या मत्स्य दुष्काळाने ‘दर्याचे राजे’ संबोधले जाणाऱ्या मच्छीमारांचा दर्याचा आधार यंदाच्या मौसमात दुरावला गेल्याने ते चिंताग्रस्त झाले आहेत. आधीच मत्स्याचा दुष्काळ आणि त्यात कर्जाचा डोंगर यामुळे ते हवालादिल झाले आहेत. वसईतील मच्छीमारांचा यंदाचा मौसम कोरडा गेल्याची प्रतिक्रिया येथील मच्छीमारांकडून ऐकण्यास मिळत आहे. वसईच्या किनारपट्टीवर पूर्वीसारखी मासळी मिळत नाही. खाडीत जाळी लावली तर ती मासळीने भरत नाही. ती जड होते गाळ आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या कचऱ्याने. म्हणजेच ७० टक्के कचरा तर ३० टक्के मच्छी जाळ्यात मिळते. वसई किनारपट्टीतील २० ते २५ गावांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. येथील शेकडो कुटुंबे प्रत्यक्ष मासेमारी करतात, तर आणखी कुटुंबे मासेमारीशी संबंधित व्यवसायात आहेत. त्यामुळे यंदाच्या खेपेला समुद्रात मासे कमी प्रमाणात मिळाल्याने एका फेरीसाठी ४० ते ५० हजार खर्च करून गेलेल्या बोटीचा खर्च तसेच बोटीवर काम करणाऱ्या खलाशांचा पगार हा खर्च निघाला नसल्याने मच्छीमार कर्जाच्या जंजाळय़ात अडकला आहे. राज्याच्या सागरी सीमाक्षेत्रात १ जून ते ३१ जुलैपर्यंत यांत्रिक मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी लागू करणार असल्याने अजून दोन महिने उपजीविकेचे साधन बंद राहणार आहे. पावसाळय़ात दरवर्षी या बंदीमुळे मच्छीमार समुद्रात काही अंतरावर मासेमारी करून उदरनिर्वाह करायचे, पण आता तीही बंद झाल्याने मच्छीमारांसमोर जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मत्स्योत्पादनात घट झाल्याने त्याचा थेट परिणाम मच्छीमारांच्या जीवनावर झाला आहे. दिवसेंदिवस कमी होत चाललेली मासळी, त्यातून कमी झालेले उत्पन्न आणि डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा, या फेऱ्यातून बाहेर कसे पडायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे. - दिलीप माठक, सचिव, कोळी युवा शक्ती