मुंबईसह ठाण्याला मंगळवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, या पावसात दोन जणांना जीव गमवावा लागला. यात एका महिलेसह एका तरुणाचा समावेश आहे. पावसामुळे तुंबलेल्या नाल्याच्या पाण्यात ३ वर्षांच्या चिमुकलीसह दोघे जण वाहून गेले आहेत. या तिघांचा शोध सुरु आहे. कळव्यातील नाल्यात पडून शाहीद हारुन शेख (वय २८) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला नाल्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. सकाळपासून बरसणाऱ्या पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कळव्याच्या न्यू शिवाजी नगर आणि शांती नगर परिसरातून महिला आणि पुरुष वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना एका महिलेचा मृतदेह मिळाला. तिची ओळख अद्याप समजू शकलेली नाही. तर एका तरुणाला वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. ठाण्यातील आणखी एका घटनेत कोरम मॉल येथे ३ वर्षीय मुलगी वाहून गेली असून, तिचा शोध सुरु आहे. राम नगर येथून पाण्याच्या प्रवाहात मिनू आठवाल देखील बेपत्ता झाल्याची माहिती मिळते आहे. ठाण्यातील किसन नगर परिसरातील एकविरा दर्शन ही इमारत धोकादायक असल्यामुळे खाली करण्यात आली. दुसरीकडे महात्मा फुले नगर परिसरातील परिवर्तन अपार्टमेंट ही इमारत देखील खाली करण्यात आली आहे. दरम्यान ठाण्यात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.