पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत सुनील सांगळे या इसमाने आपली पत्नी अर्चना हिचा गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली. या दोघांमध्ये बुधवारी झालेल्या भांडणानंतर सुनीलने हे पाऊल उचलले. मात्र धक्कादायक म्हणजे त्यानंतर त्याने स्वतःदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला.

सुनील सांगळे (४०) हा रिक्षाचालक होता. तर अर्चना ही आयटी पार्कमध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून नोकरी करीत होती. अर्चनाच्या चारित्र्यावर सुनीलला संशय होता. यावरून दोघात नेहमीच भांडणे होत होती. बुधवारी रात्री हे भांडण विकोपाला गेले आणि सुनीलने पत्नी अर्चना हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने अर्चनाच्या घरी फोन करून “तुमच्या मुलीला देवाघरी पाठवले” असे सांगितले. या फोननंतर गळफास लावून सुनीलनेही आत्महत्या केली.

श्रीनगर पोलिसांना अर्चनाच्या कुटुंबीयांनी संपर्क केला. त्यांनतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना दोन मृतदेह सापडले. आणि तीन वर्षाची मुलगी त्या मृतदेहाजवळ आढळली. सुनीलच्या फोनमुळे हत्या आणि आत्महत्येचा उलगडा झाला. घरात सुनीलने हत्या आणि आत्महत्या का केली याचा खुलासा लिहला आहे. यात अर्चनाच्या नातेवाईक यांच्यासह ९ जणांची नावे लिहली आहेत. पोलीस त्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात सुनील विरोधात गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरु आहे.