नाटक म्हणजे केवळ संवाद म्हणणे नव्हे, तर भूमिकेची समज महत्त्वाची असते. नाटय़लेखनापासून ते नाटक रंगमंचावर येणे ही खूप मोठी प्रक्रिया असून ती जाणून घेणे महत्त्वाचे असते, असे मत लेखक, दिग्दर्शक, अभिनेते पंकज चेंबूरकर यांनी ‘प्रतिभावंत बदलापूरकर’ या व्यासपीठावर व्यक्त केले. आपल्या पाल्यांना लगेचच मालिकेत भूमिका मिळेल या आशेने पालकांनी मुलांना अभिनय कार्यशाळेत पाठवू नये असे परखड मत अभिनेत्री मृणाल चेंबूरकर यांनी मांडले. बदलापुरातील प्रतिभावंतांची ओळख करून देणारे व्यासपीठ म्हणून प्रतिभावंत बदलापूरकर या कार्यक्रमाचा बारावा कार्यक्रम नुकताच पार पडला. या प्रसंगी पंकज आणि मृणाल चेंबूरकर या अभिनय क्षेत्रातील यशस्वी दांपत्यांची मुलाखत भूषण करंदीकर यांनी घेतली. या वेळी चेंबूरकर दांपत्यांनी मनमोकळा संवाद साधला. हौशी रंगभूमी, बाल रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा विविध माध्यमांतून सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रयोगशील काम करणाऱ्या चेंबूरकर दांपत्याचा कला क्षेत्रातील प्रवास या वेळी बदलापूरकरांसमोर उलगडला. कलाकाराला घडवणारे, त्याच्याकडून काम काढून घेणारे, कलाकाराला भूमिका समजावून सांगणारे आणि त्याला त्या भूमिकेपर्यंत पोहोचवणारे पंकज हे दिग्दर्शक आणि लेख म्हणून अधिक भावतात असे या वेळी मृणाल चेंबूरकर यांनी सांगितले. माहेरी सर्वजण नाटय़प्रेमी असल्याने या क्षेत्रात काम करण्यासाठी नेहमीच घरातून प्रोत्साहन मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. नाटय़क्षेत्रातील कोणतीही पाश्र्वभूमी नसताना पंकज यांनी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. सुमारे ४० एकांकिका तसेच दहा नाटकांचे लेखन, दिग्दर्शन आणि मालिकांच्या पटकथा तसेच संवाद लेखनाचे काम करताना पंकज खरेतर रमतात ते दिग्दर्शनात, अशाही आठवणी या वेळी त्यांनी सांगितल्या. आपल्या कारकीर्दीविषयी सांगताना मृणाल यांनी आपल्या एकांकिका आणि अभिनयाचा अनुभव प्रेक्षकांसमोर उलगडला. मुलुंडमधील पाम एकर्स सोसायटीतर्फे आयोजित एकांकिका स्पर्धेत तर आमच्या एकांकिकेला वन्स मोअर मिळाला आणि ती एकांकिका पाहण्यासाठी एक सरदारजी गृहस्थ जिथेही प्रयोग होईल तिथे पोहोचायची अशी त्यांनी आठवण सांगितली.