कल्याण : कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांतील पदपथ, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील झाकणे तुटलेली आहेत. पालिका शहर अभियंता, बांधकाम विभागाचे या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष नसल्याने रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. पालिकेकडून नाले, गटार सफाईचा मोठा दावा केला जात असला तरी पूरपरिस्थिती निर्माण झाली. जागोजागी पाणी तुंबले अशा वेळी गटारांवरील तुटलेल्या झाकणांमधून पाणी बाहेर आले तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न सोसायटी पदाधिकारी उपस्थित करत आहेत. तुटलेल्या झाकणांच्या तक्रारी पालिकेत केल्या की त्याची दखल घेतली जात नाही. अनेक वेळा अधिकारी वर्ग जागेवर नसतो. पालिका मुख्यालयात वरिष्ठांना संपर्क केला तर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही, असे रहिवाशांनी सांगितले. निकृष्ट दर्जाची झाकणे गटार तसेच रस्त्यांवरील गटारांवर बसवली जातात. अवजड वाहने या रस्त्यावरून सतत जाऊन झाकणे तुटतात, अशा तक्रारी वाहनचालकांनी केल्या. पालिकेच्या आवारात सिमेंटची झाकणे पडलेली असतात. ही झाकणे उचलण्यासाठी आठ ते दहा जण लागतात. अनेक वेळा पालिका कर्मचाऱ्यांना झाकणे तुटल्याची तक्रार केली की पालिकेत या आणि आवारातील झाकण घेऊन जा असे उत्तर मिळते. ते झाकण अवजड असल्याने त्याची वाहतूक करणे अवघड जाते. अधिकारी आपली जबाबदारी झटकून मोकळे होतात, अशा रहिवाशांच्या तक्रारी आहेत. डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचावाडा रस्त्यावर अनेक ठिकाणी गटारे तुटली आहेत. हा रस्ता मुख्य वर्दळीचा आहे. रात्रीच्या वेळेत रस्त्यावरील वीजपुरवठा बंद असेल आणि एखाद्या पादचाऱ्याला तुटलेले झाकण दिसले नाही तर तो थेट गटारात पडेल, अशी माहिती गरिबाचावाडा येथील गजानन महाराज मंदिराचे पुजारी राजू जोशी यांनी दिली. गटारावर झाकणे नसल्याच्या तक्रारी पालिकेत केल्या तर अधिकारी उत्तर देत नाहीत. कधी ते जागेवर नसतात. शहर अभियंता विभागाचे बांधकाम विभागावर नियंत्रण राहिले नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका रहिवाशांकडून केली जात आहे. ठेकेदाराकडून पुरेशा प्रमाणात झाकणे मिळाली आहेत. झाकणे तुटलेली दिसली की तात्काळ बसविली जातात. काही सिमेंटची झाकणे जड आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.