|| सागर नरेकर निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी क्लृप्त्या; करोनाचा प्रभाव ओसरल्यामुळे राजकारण्यांची लगबग अंबरनाथ : करोनाच्या संकटामुळे वर्षभरापासून रखडलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून या पाश्र्वाभूमीवर दोन्ही शहरांमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी विविध मार्गांनी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी मतदारांना देवदर्शनासाठी घेऊन जाणे, हळदी-कुंकू कार्यक्रमातून महिलांना भेट वस्तूंचे वाटप करणे, कोणत्याही कारणाने जेवणावळी आयोजित करणे आणि मतदारांचे वाढदिवस साजरे करणे असे कार्यक्रम राबविले जात आहेत. अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या नगरपालिकांचा कार्यकाळ गेल्या एप्रिल महिन्यात संपुष्टात आला. मात्र करोनाच्या संकटामुळे दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुका अनिश्चिात काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या. राज्यभर निर्विघ्न पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील राजकीय पक्षांना पालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांतील नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामध्ये मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप शिबीर, मोतीबिंदू तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया शिबीर, रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीर, स्नेह संमेलने अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी देवदर्शन आणि पर्यटन यात्रा, तरुणांसाठी क्रीडा साहित्य वाटप, तरुणांसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन, शेतघरांवर ओल्या पाट्र्याही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. याशिवाय, दिनदर्शिकावाटप, आधार कार्ड, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, निवृत्ती सभारंभ, हळदी-कुंकू समारंभ आयोजित करून त्यात साड्या, गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करणे अशा कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे. मोठी गृहसंकुले आपल्या प्रभावाखाली रहावीत यासाठी मानीव अभिहस्तांतरण शिबीर भरविणे, गृहसंकुलांच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून देणे, गृहसंकुलांमध्ये स्पर्धा भरविणे, खेळाचे साहित्य उपलब्ध करून देणे, रंगरंगोटी करणे, सुशोभीकरण करून देणे, गृहसंकुलांच्या आसपास पूर्णत्वास आलेल्या कामांचे उद्घाटन करणे, नव्या कामांचे भूमिपूजन करणे अशा कार्यक्रमातूनही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहे. जनसंपर्क कार्यालयांना ऊत निवडणुकांच्या तोंडावर अंबरनाथ आणि बदलापूर शहरात जनसंपर्क कार्यालयांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू झाला आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या इच्छुक उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी वरिष्ठ नेते, स्थानिक आमदार, खासदार यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सध्या प्रत्येक प्रभागात एकेका पक्षाची दोन ते तीन जनसंपर्क कार्यालये सुरूझाल्याचे चित्र दिसून येत आहे.