पुनर्वसनाबाबत एमआयडीसीने आश्वासनाची पूर्तता न केल्याने घरे सोडण्यास ग्रामस्थांचा नकार मुसळधार पावसामुळे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरू लागली असल्याने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असले तरी मुरबाड तालुक्यातील बारवी धरण परिसरात मात्र काहीसा तणाव आहे. यंदा धरणात ४० टक्के अधिक जलसाठा होणार असून त्यामुळे तोंडली आणि काचकोली या दोन गावातील साठ घरे बुडणार आहेत. सध्या ७७.८५ टक्के भरले असून ८९ टक्के जलसाठा झाल्यावर घरे बुडणार आहेत. मात्र मृत्यू साक्षात दारात उभा राहूनही येथील रहिवाशांनी घरे सोडण्यास नकार दिला आहे. एमआयडीसी प्रशासनाने येथील रहिवाशांना राहण्यासाठी मुरबाडमध्ये सदनिका भाडय़ाने घेतल्या आहेत. मात्र शेतीवाडी आणि गुरेढोरे सोडून रहिवासी येथून १२ किलोमीटर दूर असलेल्या मुरबाडमध्ये जाण्यास नकार दिला आहे. जिल्ह्य़ातील पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर बारवी धरण विस्तारीकरण प्रकल्प शहरांना लाभदायक ठरणार आहे. विस्तारीकरणानंतर बारवी घरणात सध्याच्या तुलनेत दुप्पट जलसाठा होईल. पहिल्या टप्प्यात यंदा ४० टक्के अधिक साठा होणार आहे. मात्र त्यामुळे बाधित व्हावे लागणाऱ्या तोंडली आणि काचकोली गावकऱ्यांनी घरे सोडण्यास ठाम विरोध केला आहे. पुनर्वसन पॅकेजबाबत रहिवासी असमाधानी आहेत. उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत दिलेल्या आश्वासनांची अद्याप एमआयडीसी प्रशासनाने पूर्तता केली नसल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. धरणाच्या पाण्यात कोणाचा जीव गेला तर त्याला सर्वस्वी एमआयडीसीचे अधिकारी जबाबदार असतील, असा इशाराही प्रकल्पबाधितांनी दिला आहे. बारवी धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हे निळवंडे पॅकेजच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गावकऱ्यांना मोबदला तसेच इतर सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र गावकऱ्यांच्या आणखी मागण्या असून त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न वरिष्ठ स्तरावरून सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एमआयडीसीच्या वतीने सांगण्यात आले. तसेच ६० घरांची पुनर्वसनाची सुविधा ही मुरबाड येथे करण्यात आली असून त्यांची कुटुंब स्थलांतरित करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. उद्या धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्याला एमआयडीसी जबाबदार नसेल, असेही एमआयडीसीने स्पष्ट केले.