अन्न व औषध प्रशासनाकडून १० पथकांची नेमणूक; ३२४ नमुने तपासणीसाठी ताब्यात

आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने मिठाईच्या दुकानांची तपासणी मोहीम सुरू केली असून त्यासाठी दहा पथके नेमण्यात आली आहेत. त्यांनी आतापर्यंत ३२४ मिठाईंचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून ही कारवाई ३१ ऑक्टोबपर्यंत सुरू राहणार आहे, तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये आढळून आलेल्या अनुभवामुळे मोठय़ा मिठाई दुकानदारांची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दिवाळीच्या काळात मोठय़ा प्रमाणात मिठाईची विक्री होते. त्यात काही वेळा विषबाधा होण्याची शक्यता असते. बाहेरगावाहून येणाऱ्या माव्यामुळे विषबाधा होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे यंदा माव्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाची करडी नजर आहे. मिठाई व्यवसायात असणाऱ्यांसाठी प्रशासनाने एक छोटी मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यात मिठाई व्यावसायिकांनी कोणती काळजी घ्यावी, याचे सविस्तर विवेचन आहे. मात्र बहुतेक मिठाई विक्रेते ही पुस्तिका वाचत नाहीत. त्यामुळे आता मिठाई व्यावसायिकांना यासंदर्भातील प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. प्रशिक्षण असल्याशिवाय व्यवसायाचा परवाना न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, तसेच परवान्याचे नूतनीकरण करतानाही संबंधित व्यावसायिकांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.

२० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या ४० दिवसांत कोकण विभागात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यातून प्रशासनाने तब्बल ९ लाख २० हजार ७४४ रुपयांचा नित्कृष्ट दर्जाचा माल जप्त केला.  – सुरेश देशमुख, सहआयुक्त

  • ठाणे जिल्ह्य़ातील मिठाईची दुकाने तपासण्यासाठी प्रशासनाने एकूण दहा पथके नेमली आहेत.
  • एका पथकात प्रत्येकी तीन ते चारजण आहेत.
  • प्रत्येक पथकात एक सहाय्यक आयुक्त आणि अन्न निरीक्षक आहेत.