कल्याण-शिळफाटा मार्गावर गेल्या दोन दिवसांपासून खिडकाळी ते परिवार हॉटेलपर्यंत रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एका मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू केल्याने आधीच वाहतूक कोंडीत अडकलेल्या या मार्गावर आता आणखी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. गुरुवारी रात्री १० नंतर अवजड वाहनांचा भार आणि कंपन्यांच्या बसगाडय़ा यामुळे शिळफाटय़ापासून काटई नाक्यापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. अवघे १५ मिनिटांचे अंतर गाठण्यासाठी वाहनचालकांना एक तासाचा वेळ लागत होता. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यावश्यक वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासास बंदी आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली आणि त्यापलीकडे राहणारे रहिवासी मुंबई, ठाणे, नवी मुंबईत कामानिमित्त जाण्यासाठी कल्याण-शीळ रस्त्याचा उपयोग करतात. गेल्या काही वर्षांपासून कल्याण-शीळ मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम एमएसआरडीसीकडून सुरू आहे. लोकल बंद असल्याने कल्याण- डोंबिवलीहून मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचा भार या मार्गावर आला आहे. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे दररोज या वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे वाहनचालकांना कठीण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना दररोज मुंबई गाठण्यासाठी चार ते पाच तास लागत आहेत. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस दररोज सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना एक अतिरिक्त मार्गिका सकाळी, रात्रीच्या वेळी अडथळे तयार करून उपलब्ध करून देतात. गेल्या दोन दिवसांपासून खिडकाळी ते परिवार हॉटेलपर्यंत मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता अतिरिक्त मार्गिका तयार करण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. वाहनांना ये-जा करण्यासाठी केवळ दोनच मार्गिका शिल्लक असल्याने आता रात्रीच्या प्रहरी मुंबई, नवी मुंबईहून पुन्हा कल्याण, डोंबिवलीतल्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. अवजड वाहनांची डोकेदुखी ठाणे आयुक्तालय परिसरात अवजड वाहनांना रात्री १० ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत येण्यास परवानगी आहे. त्यामुळे सकाळी खोणी येथे रोखून ठेवलेल्या अवजड वाहनांना रात्री १० नंतर सोडून देण्यात येते. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा भार वाढून वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. रात्री अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवीत असल्यानेही वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.