घरगुती भांडणातून संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नी आणि दोन मुलांवर चाकूचे वार करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. विरारच्या कारगिल नगर येथे शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पती मृत्यूशी झुंज देत आहे. मुलांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहे.

विरार पूर्वेच्या कारगिल नगरमधील विष्णू विहार इमारतीत कृष्णा कदम (४०), कल्पिता (३८), अथर्व (८) आणि जाई (१०) असे कुटुंब राहते. नोकरी गेल्याने कृ ष्णा विरारमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा, तर कल्पिता भाभा रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. शुक्रवारी रात्री कृष्णा आणि कल्पिता यांच्यात जोरदार भांडण झाले. त्या वेळी कृष्णाने चाकूने कल्पिता आणि मुलांवरही वार केले आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.
स्थानिक कार्यकर्ते बाळा पाटील आणि नगरसेवक प्रशांत राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत कल्पिता मरण पावली होती. मुलांच्या प्रकृतीचा धोका टळला असला तरी कृष्णाचीे प्रकृती गंभीर आहे.