या महिन्यापासून अंमलबजावणी कुपोषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे कुप्रसिद्ध बनलेल्या पालघर जिल्ह्यतून कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून शनिवार, १ सप्टेंबरपासून पोषण अभियान राबवण्यात येणार आहे. पूरक पोषण आहाराचा दर्जा तपासणे, पूर्वबाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण देणे अशा उपाययोजनांद्वारे माता व बालकांना सशक्त बनवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण आणि कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही कुपोषणमुक्ती करण्यात अपयश येत असल्याने आता संयुक्तपणे त्याविरोधात उपाय राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मातांसह बालकांच्या सुदृढ वाढीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पोषण महिना अभियानांतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, माहिती व जनसंपर्क, शालेय शिक्षण अशा सर्व विभागांशी समन्वय करण्यात येणार आहे. पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी केंद्र इमारतीचे बळकटीकरण करणे, पूरक पोषण आहारच्या गुणवत्तेची खात्री करणे, प्रभावी आरोग्य सेवा पुरवणे, पूर्वबाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण, शिक्षण आणि संप्रेषण या विषयाचे बळकटीकरण करणे अशा महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून कृती कार्यक्रम व वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. तसेच गावागावात विशेष ग्रामसभांचे आयोजन, जनजागृतीसाठी प्रभात फेऱ्या, पोषण जागृती दिंडी, पोषणाशी निगडित विविध स्पर्धा, सामाजिक लेखा परीक्षण, पोषण मेळावे असे विविध उपक्रम जिल्हा परिषद राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेने दिली आहे.