पापडखिंड धरणात तेलाचे तवंग; जुचंद्रच्या तलावातही दूषित पाणी वसई : परवानगी नसतानाही विरारच्या पापडखिंड धरणात करण्यात आलेल्या छटपूजेमुळे येथील पाणी दूषित झाले आहे. तेलाचे हजारो दिवे पाण्यात सोडण्यात आल्याने धरणाच्या पाण्यावर तेलाचा तवंग आढळून आला आहे. या धरणातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याने आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जुचंद्र येथील गोडे तलावातही छटपूजा करण्यात आल्याने या तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. वसई-विरार शहरात मंगळवारी विविध ठिकाणी छटपूजा साजरी करण्यात आली. मात्र फूलपाडा येथील पापडखिंड धरणात हजारो नागरिकांनी उतरून छटपूजा केली. यावेळी तेलाचे दिवे, निर्माल्य धरणाच्या पाण्यात सोडण्यात आले. यामुळे धरणाचे पाणी प्रदूषित झाले. बुधवारी धरणाच्या पाण्यावर तेलाचे तवंग साचल्याचे आढळून आले. छटपूजेमुळे धरण परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. पूजेनिमित्त आणलेले साहित्य, निर्माल्याचा कचरा जागोजागी पडलेला होता. बुधवारी महापालिकेने धरण परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली. धरणातील पिण्याच्या पाण्यावर तेलाचे तवंग आढळळ्याने हे पाणी नागरिकांसाठी अपायकारक ठरणार आहे. महापालिकेने धरणातील पाणी पिण्याच्या वापरासाठी बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्ष हे पाणी अजूनही नागरिकांना पिण्यासाठी दिले जात असल्याचे उघड झाले आहे. छटपूजेमुळे धरणाचे पाणी दूषीत झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. फूलपाडा येथील स्थानिक रहिवासी विलास चोरघे गेल्या काही वर्षांपासून या छटपूजेला विरोध करत आहेत. आजही हे पाणी आम्हाला पिण्यासाठी पालिका देते. तेलाचे दिवे, निर्माल्य पाण्यात सोडून छटपूजा केली जात असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. छटपूजेला विरोध नाही, मात्र पिण्याचे पाणी अशुद्ध करण्यास आमचा कायम विरोध राहील, असे ते म्हणाले. नायगावचा तलावही प्रदूषित नायगाव पूर्व भागातील परप्रांतीयांची लोकसंख्या वाढत आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय नागरिकांनी येथील जुचंद्र गोडे तलावाला घेराव घालून रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी केली. गोडेतलावाला हजारो परप्रांतीय नागरिकांचा वेढा पडला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांची गोची झाली. प्रचंड वाहतूक कोंडीला त्यांना सामोरे जावे लागले. तसेच छटपूजेनंतर मोठय़ा प्रमाणात गोडे तलावाजवळ कचरा टाकण्यात आला आहे. ध्वनी मर्यादेचे उल्लंघन हा कायद्यने गुन्हा असतानादेखील फटाके वाजवण्यात आले.