आतापर्यंत नवरीला लग्नमंडपातून पळवून नेल्याचे तुम्ही चित्रपटात वगैरे पाहिलं असेलच. पण मौदहा गावात यापेक्षाही हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. इथल्या लग्न मंडपात बंदूक घेऊन एक तरूणी आली आणि तिने सगळ्यांच्या डोळ्यादेखत नवऱ्याचे अपहरण केलं. तिला कोणीही रोखू शकलं नाही. आता या नवरदेवाचा कुठेच पत्ता लागत नाही, तेव्हा घरची मंडळी मात्र चिंतेत आहेत. या तरूणीने नवऱ्याचे अपहरण का केलं, याचं कारण तसं गंभीरच आहे म्हणा. नवरदेवासोबत या तरूणीचे प्रेमप्रकरण सुरू होतं. पण तिला फसवून त्याने दुसरीच्या गळ्यात माळ घातली हा प्रकार जेव्हा त्या तरूणीला समजला तशी काही तरूणांना घेऊन ती लग्नमंडपात पोहोचली आणि बंदुकीचा धाक दाखवत या नवरदेवाला घेऊन गेली.

मौदहामध्ये ही घटना घडली. इथे राहणाऱ्या अशोकचा विवाह भवानीपूर इथल्या मुलीशी ठरला होता. लग्नाचे अनेक विधीही पार पडले, पण त्याचे आधीच एका तरूणीशी प्रेमप्रकरण सुरू होते. लग्न ठरल्यानंतर त्याने प्रेयसीला दगा दिला आणि दुसरीसोबतच विवाह रचला. ही गोष्ट जेव्हा त्याच्या प्रेयसीला समजली तेव्हा मात्र तिचा पारा भयंकर चढला. हातात बंदूक आणि सोबतीला काही माणसं घेऊन तिने फिल्मी स्टाईलने लग्न मंडपात एण्ट्री घेतली. फसवल्याचा राग तिच्या डोक्यात होताच. तेव्हा ‘प्यार हमसे किया और शादी किसी और से करोगे. हम बर्दाश्त नहीं करेंगे इसे असं म्हणत नवऱ्यावर बंदूक रोखली. काही कळायच्या आतच तिने नवऱ्याची कॉलर पकडली आणि त्याला वऱ्हाडी मंडळीच्या डोळ्यादेखत पळवून नेले. आता दोन दिवस उलटले तरी या नवऱ्या मुलाचा काहीच पत्ता नाही. तेव्हा कुटुंबियांच्या चिंता मात्र खूपच वाढल्या आहेत.