Father letter to son: बाप आणि मुलाचं नातं हे वरकरणी शांत दिसत असलं तरी ते नातं मुळापासून नेहमी घट्ट असतं. मुलं जशी मोठी होतात तसं त्यांना हळूहळू त्यांची आर्थिक जबाबदारी समजत जाते, त्याला वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा पदरही असतो. आपलं ध्येय गाठण्याच्या ओघात कळत – नकळत त्यांचं घराकडे, घरच्या माणसांकडे दुर्लक्ष होत जातं. अशाच स्वत:ला कामात, जबाबदारीत गुंतवून घेतलेल्या आपल्या मुलाला पुन्हा बेफिकीर होऊन आपलं स्वच्छंदी आयुष्य जगायला शिकवणाऱ्या वडिलांचं पत्र सध्या व्हायरल होतंय. हे पत्र वाचून तुमच्याही डोळ्यात नक्की पाणी येईल.

आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा…!

“नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा. पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी की ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल…!! ‘माझ्या लाडक्या मुला. मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव….!! जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी पडतील- बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बन्या. मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार. मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय. माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे. जेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी तु चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच यागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस. जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही. आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा…”

प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना

” प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणेही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दुख:लाही जास्त कवटाळून बसू नकोस. अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरं, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना…”

वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा वाच! फक्त तुझेच वडील…

“माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वतःच्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करण ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायच की श्रीमत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा. आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं पण ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही तर मेहनत करातीच लागते. जगात काहीच पुकट मिळत नाही. बाळा तुला हे पाठवलेलं पत्र आवडेल की नाही हे माहिती नाही. पण हे पत्र तुझ्या आयुष्याची शिदोरी नक्की बनेल हे मात्र नक्की. म्हणून बाळा तुला हे पत्र आवडो वा ना आवडो लगेच फेकून देऊ नकोस. या पत्राला तु नेहमी तुझ्या सोबत ठेव व वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा वाच! फक्त तुझेच वडील”

पाहा पत्र

हेही वाचा >> बापरे! रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडी थांबताच अवघ्या ३ सेकंदात मोबाईल लंपास; प्रवाशांनो खिडकीजवळचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

हे पत्र सोशल मीडियावर khaki_cha_rubab नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. हे पत्र पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.