हिंदू मुस्लिम या दोन धर्मांच्या नावाखाली आतापर्यंत आपल्या देशात अनेकदा राजकारण झाले. या दोन्ही समाजात अजूनही काहीप्रमाणात दुरावा असल्याचे चित्र दिसते. पण या सगळ्याला अपवाद ठरणारी हिंदू मुस्लिम ऐक्याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. याचचं ताजं उदाहरण म्हणजे कोलकातामधल्या मालदा जिल्ह्यातले. मालदामधल्या गोखपुरा गावात मुस्लिम समजाची संख्या जास्त आहे. या गावात फक्त तीनच हिंदू कुटुंब राहतात. दोन दिवसांपूर्वी या गावात राहणाऱ्या हिंदू कुटुंबातील मुलाचा मृत्यू झाला. पण नेमक्या त्याचवेळी गावातील इतर हिंदू कुटुंबियांपैकी लोकही त्याठिकाणी उपस्थित नव्हते. तसेच मृत मुलाच्या कुटुंबियांकडे अंत्यसंस्कारासाठी फारसे पैसे नव्हते. आपल्या मृत मुलाचे शव स्माशानभूमीपर्यंत न्यायचे कसे याच विचारांनी त्याचे कुटुंबिय दु:खी झाले होते. तेव्हा याच गावातील काही मुस्लिम तरूण त्यांच्या मदतीसाठी धावून आले. या तरुणांनी या हिंदु कुटुंबाला मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी हिंदू रिवाजाप्रमाणे त्याची अंत्ययात्रा काढली आणि स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केल्याचे वृत्त 'नवभारत टाईम्स'ने दिले आहे. या गावापासून स्मशानभूमी आठ किलोमीटर दूर होती पण या तरूणांनी आपल्या परिने शक्य असेल तितकी सारी मदत मृताच्या कुटुंबियांना केली. धर्म माणसांना एकमेकांपासून दूर ठेवतो. पण धर्माआधीही माणूसकीचा धर्म सगळ्यात मोठा आहे. म्हणूनच आम्ही कोणताही दुजाभाव न करता आणि एकोप्याने राहतो असेही हे गावकरी अभिमानाने सांगतात.