वसई:  पन्नास वर्षांहून अधिक जुना झालेला वसई रेल्वेवरील अंबाडी पूल जीर्ण झाल्याने निष्कासित केला जाणार आहे. त्या जागी आता नवीन पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे सोमवार पासून हा रेल्वे पूल बंद करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई शहराच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा जूना अंबाडी पूल आहे. हा पूल ६ मीटर रूंद आणि १६० मीटर एवढा लांब आहे. लोखंडाचा वापर करून या पूलाची उभारणी करण्यात आली आहे.  ५५ वर्षापेक्षा अधिक जुन्या असलेल्या या पूलावरून वाहनांची ये-जा होत असते. हा पूल जुना झाल्याने त्याला ठिक ठिकाणी तडे गेले होते. त्यामुळे पर्याय म्हणून नवीन पूल बांधण्यात आला आहे. २०१९ पासून नवीन पूल वापरात आहे.  जुना पूल ही वाहतुकीला खुला राहावा यासाठी सहा वर्षांपूर्वी रेल्वेने या पुलाची दुरूस्ती केली होती.

हेही वाचा >>>महापालिकेच्या वाहनाखाली येऊन दुचाकीस्वार ठार, भाईंदर पश्चिम येथील घटना

मात्र पुलाची क्षमता लक्षात घेता या पुलाच्या दोन्ही बाजूने लोखंडी कमानी उभारुन केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीला सुरू ठेवण्यात आला होता. दिवसेंदिवस या पुलाची अवस्था बिकट होत असल्याने रेल्वेने या पुलाचे सर्वेक्षण व लेखापरीक्षण करून हा पूल आता वाहतुकीला धोकादायक ठरू शकतो. यासाठी आता जुना अंबाडी पूल निष्काासित करण्याचा निर्णय घेतला आहे.  हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी केली जाणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. त्यासाठी  रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूने पत्र्याचे बेरिगेट तयार करून लावून सोमवार पासून हा पूल वाहतुकीला बंद करण्यात आल्याचा सूचना फलक लावण्यात आला आहे.

वाहतूक कोंडीची शक्यता

वसईत वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. त्यामुळे वसई पूर्व व पश्चिम असा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचू संख्या अधिक आहे.आता जुना अंबाडी पूल वाहतुकीला बंद झाल्याने आता सर्व वाहने ही थेट नवीन पुलावरूनच ये जा करणार आहेत. त्यामुळे या पुलावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

सेतू भारतम या योजनेतून नवीन रेल्वे उड्डाणपूल

रेल्वेने या पुलाचा संरचनात्मक पाहणी अहवाल तयार केला करून हा पूल  कमकुवत असून त्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे ७ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे रेल्वेने वसई विरार महापालिकेला सांगितले होते. मात्र दुरुस्तीनंतर या पुलावरून अवजड वाहतूक होणार नसल्याने महापालिकेने नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या सेतू भारतम या योजनेअंतर्गत जूना पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल उभारला जाणार आहे. यासाठी महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे.

विरार बोरिवली दरम्यान नवीन रेल्वे वाहिन्यांचा विस्तार याशिवाय पूल अत्यंत जुना झाल्याने तो पाडून नवीन बांधला जाणार आहे. यासाठी आता पूल वाहतुकीला बंद केला आहे.-सुमित ठाकूर, जनसंपर्क अधिकारी पश्चिम रेल्वे

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The old ambadi railway bridge will be evicted and traffic on the bridge will be closed from monday mumbai amy