डॉ. बाळकृष्ण जमदग्नी / डॉ. बी. पी. पाटील
यावर्षी पावसाची दोन रूपे पाहायला मिळत आहेत. एकीकडे मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने पूरस्थिती उद्भवली आहे. दुसरीकडे पुरेसा पाऊस झाला नसल्याचा घोर आहे. अन्य काही घटकही लक्षात घेतले पाहिजेत. मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे आणि हवामान बदलामुळे हे सारे घडते आहे. याबाबत खचून न जाता शेतकऱ्यांनी अवर्षणकालीन पीक नियोजनाचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. यासाठी कमी कालावधीची आणि कमी पाण्यात येणारी पिके घेतली गेली तर शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान कमी होण्यास मदत होईल.




हवामानासंबंधी असलेली सुपरीचित म्हण म्हणजे ‘नेमेची येतो पावसाळा’. एखाद्या गोष्टीविषयीचे सातत्य किवा खात्री पटवणे या संदर्भात कळत न कळत वापरली जाते. अर्थात अवर्षण हे महत्त्वाचे वैगुण्य असले तरी हजारो वर्षे पृथ्वीतळावर याचेही सातत्य आहे. पृथ्वीवरील जैविक विविधता त्यामुळे टिकून आहे. पाऊस हा पृथ्वीवरील वातावरण, जलावरण व पाणी चक्र यांचा एक महत्त्वाचा घटक असून त्यांची अखंड अशी साखळी आहे. या साखळीतील कोणताही एक किंवा एकापेक्षा अधिक घटक प्रभावीत झाल्यास पाऊस प्रभावित होतो. त्यात एकूण पाऊस, पावसाचे वितरण, पावसाची तीव्रता, पावसाचे दिवस या घटकांवर प्रभाव होऊन त्याचे जैविक घटकांवर चांगले किवा वाईट परिणाम होतात. एकंदरीत पर्यावरण प्रभावीत होते. पिके, प्राणी, सूक्ष्म जीव व एकंदर शेती प्रभावग्रस्त होऊन मानवी जीवन व सर्वाधिक शेतकरी बळी पडतो. त्याचा पहिला प्रभाव हा शेतीवरच पडत असतो.
सन २०२३ वर्षां विलंब चालू साली नैऋत्य मौसमी पाऊस आगमन सुमारे एक ते दीड महिना लांबलेले आहे. त्याचा हंगामी व बहुवर्षी पिकांवर दुष्परिणाम होत आहे. पीक हंगामाची सुरुवात ही मान्सून आगमनाने होते. रोहिणी व मृग नक्षत्रावर सगळीकडे बियाणे पेरणीची धांदल सुरू असते. ‘रोहिणी पेरा मोत्याचा तुरा’ अशी एक सांकेतिक म्हण आहे. लवकर पेरणी पीक यशस्वी होणार, याची पारंपरिक अनुभवसिध्द खात्री असते. वेळेवर पेरणी हा पण पारंपरिक संकेत असतो. तसेच वापसा (घात) पकडणे पण पीक यशस्वी करण्याचे अजून एक संकेत मानले जाते.
पेरणी हा खरे तर एक पवित्र प्रघात. कुरी पूजन, बैलांना कडधान्ये पिकांचा कोंडा भल्या पहाटे देणे, त्यानंतर कडबा, सुके गवत. तसेच त्यांना काळय़ा सोयाबीनच्या भरडय़ाचा खुराक दिला जातो. मग एकदा पेरणी सुरू झाली की संपेपर्यंत काहीच दिले जात नाही. बैलांचा सोगा आणि पेरक्याची बियाणे ओटी सुटणार नाही, अशी ती सगळी व्यवस्था असते. चालू वर्षी मात्र या संकेतांना अपवाद झालेला आहे. कारण लांबलेले मान्सूनचे आगमन आहे. पावसाळय़ाच्या चार महिन्यांपैकी एक महिना कोरडा गेला आहे. पीक हंगाम एक महिन्याने कमी झाला आहे. यामुळे पीक उत्पादनात घट होणार म्हणून शेतकरी कासावीस झाले आहेत. काही वेळा अतिवृष्टी, गारपीट, वादळे, पूर अशा शेतीवर विपरीत परिणाम घडवणाऱ्या घटना वारंवार होत आहेत आणि त्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
या सर्व परिस्थितीवर विज्ञान, तंत्रज्ञान आणि पारंपरिक शहाणपणाची सांगड घालून या समस्यांचे संधीत रूपांतर करणे ही काळाची गरज होऊन बसली आहे. यास खरेतर निसर्ग – पर्यावरणात मानवी हस्तक्षेप, निसर्गसंगत विकासाऐवजी पर्यावरण विचारात न घेता भरमसाठ हरित वायू व विशेष करून कर्बद्विप्रणिल वायू ऊत्सर्जन करणाऱ्या आभासी भौतिक सुखसोयी निर्मिती कारणीभूत ठरतात. याचा परिणाम जागतिक तापमान वाढ आणि पावसाचा अंगभूत लहरीपणा दिवसेंदिवस वाढतो आहे. यास निसर्गाचा कोपऐवजी मानवी करंटेपणा म्हणावा लागेल. यामध्ये अवर्षण, अवकाळी पाऊस, पूर, गारपीठ व वादळे अधिक नुकसानकारक आहेत. कार्बन ऊत्सर्जनाशी दुरान्वयानेही संबंधित नसलेला शेतकरी नाहक बळी पडतो आहे. दुर्दैव म्हणजे जगाचा पोशिंदाच भरडला जातो आहे. ही जाणीव व दखल वेळीच न घेतल्यास भौतिक विकास फोल ठरेल. यात शंकाच नाही. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याला दिलासा मिळावा, अशा बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. अवर्षण परिस्थिती अनुषंगाने लेखात दिलेल्या चौकटीमधील मुद्दे उपयोगाचे ठरतील.
पिकांचे नियोजन
- कमी कालावधीची व ताणसहनशील वाण पेरणीस घेणे.
- कडधान्ये, तेलबिया व तृणधान्ये यांचे आंतरपीक नियोजन करणे. खोल मुळे असणारी तुरीसारख्या पिकांचा आंतरभाव करावा लागेल.
- फळ पिके, बहुवर्षीय सदा हरित उपयुक्त वृक्षाच्छादित जमिनी वाढवणे आणि तशी लागवड करणे.
- ऊस पिकासाठी फेरपालट व आंतरपीक (पालेभाज्या, हरभरा, सोयाबीन) अवलंब करणे.
- पिके, वृक्ष, दूधव्यवसाय, शेळी पालन, कुक्कुट पालन व मत्स्यपालन अशा पूरक व्यवसायांची शेतीला जोड देणे.
- अपुऱ्या जमिनीमुळे संरक्षित व हरितगृह शेतीत वाढ करणे. भाजीपाला, फळपिके यासाठी मिल्चग पेपरचा वापर.
खत, औषधांचे नियोजन
- अच्छादनाचा व सेंद्रिय पदार्थ, जैविक खते व रासायनिक खते (मुख्य, दुय्यम व सूक्ष्म) यांचा एकात्मिकरितीने व्यापक प्रमाणात वापर करणे.
- ताण निवारण्यासाठी पोटॅशियम आणि सिलिकॉनचा वापर वाढविणे.
- एकात्मिक पीक संरक्षण, मशागत पध्दत, रासायनिक, सेंद्रिय, जैविक आणि भौतिक खतांचा समन्वय ठेवणे.
- फवारणीतून पोषणद्रव्यांचा पुरवठा करणे.
- ताण बसलेल्या ऊस पिकास एक टक्का चुन्याची निवळीची अळवणी आणि अर्धा टक्का फवारणी करावीे. अशा पिकास पोटॅशचा २५ टक्के जादा डोस द्यावा.
- अति तापमानापासून संरक्षण करण्यासाठी प्रकाश परिवर्तकांचा (केओलिन) अवलंब करावा.
पाण्याचे नियोजन
- ठिबक व इतर सूक्ष्म सिंचनाचा व्यापक वापर करणे, पुरेसे पाणी किवा पाणी टंचाई असताना उपलब्ध पाण्याचा नीट वापर करणे.
- माती आणि पाणी संरक्षण व संवर्धन पध्दतींचा अवलंब. तसेच शेततळी व मत्स्यपालनाचा अवलंब करावा.
- रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा अशा पाणी निचरा व साठवा पध्दतींचा अवलंब करावा.
- पिकांच्या संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी ताण कमी करण्यासाठी संरक्षित पाणी देणे तसेच हायड्रोजेल वापरावा.
- पाण्याचा ताण बसून अंशत: सुकलेल्या ऊस पिकाला सिलिकॉन जमिनीतून तसेच फवारून (५०० पी.पी.एम.) देणे.
आंतरमशागत आणि अन्य
- पिकात आंतरमशागत व तण नियंत्रण करणे.
- संतुलित वाढ, भौतिक व जैविक ताण निवारण व उत्पादन वाढ यासाठी मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्न घटकांसोबत संजीवकांचा एकात्मिक वापर करावा.
- मधमाश्या आणि इतर उपयुक्त कीटकांचा वापर वाढवणे.
- क्षारपड व चोपण जमिनी सुधार व पुन्हा क्षारपड होण्यापासून बचावकारक उपाययोजना करणे.
- शेतीमध्ये कमी खर्चिक बिना खर्चिक बाबी, तसेच हवामान अंदाज यांचा अवलंब वाढवणे.
- उत्पादन खर्च कमी करणे, यांत्रिकीकरण, मूल्यवर्धन करण्यावर विशेष भर देणे.