अर्जुन नलवडे

काहीतरी वेगळं करत समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण कुठेतरी गावखेडय़ात राहून आपल्याला हवं तेच करत समाजमाध्यमांवर लाखांच्या संख्येने हिट्स मिळवणारे अगदी मोजके असतात. अशा ठसकेबाज पाच जणांच्या आगळ्यावेगळ्या व्हायरल प्रवासाविषयी..

पूर्वी चित्रपट, नाटक, साहित्य, गीत, संगीत आणि गायन या क्षेत्रांमध्ये काही लोकांचीच किंवा घराण्यांचीच मक्तेदारी होती. टीव्ही, रेडिओवर झळकणाऱ्या माणसांचे वेगळेच विश्व असते. आपण फक्त त्यांना ऐकू शकतो किंवा पाहू शकतो. त्यांच्यासारखे गायक, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता होण्याचे एखाद्याने स्वप्न उराशी बाळगले तर लोक वेडय़ात काढायचे. ‘अपने बस की बात नही’, असे म्हणत त्याच्याही मनात न्यूनगंड तयार व्हायचा. मात्र, विज्ञान तंत्रज्ञानामुळे समाजमाध्यमांची दुनिया विकसित झाली. हातात असणाऱ्या मोबाइलवर प्रत्येकाला व्यासपीठ उपलब्ध झाले. हजारो-लाखो लोकांपर्यंत काही सेकंदांत पोहोचण्याची सोय निर्माण झाली आणि पाहता पाहता गावखेडय़ांतले लोक स्वत:ला सिद्ध करू लागले. त्यांच्यातील कला पाहून लोकांनीही त्यांना डोक्यावर उचलून धरले. फेसबुक, यूटय़ूब, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप, स्नॅपचॅट, टिकटॉक आणि इतर तत्सम अ‍ॅप्ससारख्या समाजमाध्यमांमधून यांचा आविष्कार व्हायरल झाला. त्यांच्या व्हिडीओंमुळे करोडोंच्या घरात हिट्स मिळू लागले. खरे तर ज्याच्याकडे सर्जनशीलता, कला, क्षमता आहे तो लोकांच्या पसंतीस चटकन उतरतो आणि मनावर अधिराज्य करायला लागतो. अशा लोकांच्या यादीमध्ये काही जणांची नावे आघाडीवर आहेत. पहाडी आणि धारदार आवाजाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करणाऱ्या कडूबाई खरात, अहिराणी भाषेतील गाण्यांवर खान्देशकरांना ठेका धरायला लावणारा सचिन कुमावत, डबिंगचा आगळावेगळा प्रयोग करत लोकांना खळाळून हसायला लावणारा अन् निखळ मनोरंजन करणारा ‘खास रे’चा संजय श्रीधर, मराठीत पहिल्यांदा रॅपचा प्रयोग करत शेतकऱ्यांच्या दु:खांना वाचा फोडणारा अजित शेळके आणि लोकांना थोडय़ा वेळापुरते का होईना हसवण्यासाठी मिम्स तयार करणारा सनस लडकत या पाच जणांनी समाजमाध्यमांवर अक्षरश: वादळ उठवले आहे. त्यांच्याशी साधलेला संवाद..

(संपूर्ण लेखासाठी वाचा लोकप्रभा दिवाळी अंक २०१९. बाजारात सर्वत्र उपलब्ध)