गौतमी पंडित

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

नेहमी आपण आपल्या मनुष्यजातीविषयी फार कमी बोलतो; कारण हल्ली वाटेल ती माहिती किंवा कधी कधी चुकीची माहितीही व्हायरल होते. मानवजातीचा उगम कुठे झाला? कसा झाला? का झाला?, हे शोधण्यापेक्षा त्या संदर्भातल्या भंपक रहस्यमय कथाच लोकांना आवडतात. ‘सॅपियन्स अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॅनकाइण्ड’ या लेखक युवल नोहा हरारी यांच्या पुस्तकातून मात्र एक रंजक सफर तर घडतेच पण त्यातून फॅक्ट्सही कळतात. खरं तर वास्तव काय हे जाणून घेण्याची आज जगाला फारशी गरज वाटत नाही, कारण काही लोकांना डोकं बाजूला ठेवून केवळ ऐकीव किंवा खोटी माहिती इंटरनेटवर पसरवण्याचा उद्योग करण्यातच रस असतो. या कादंबरीतून मानवजातीची खरी माहिती मिळते. मला इंटरनेटपेक्षा पुस्तकातून मिळणारे ज्ञान महत्त्वाचे वाटते. मला पुरातनयुगाची काहीच कल्पना नसताना आपण माकडांपासून माणूस कसे बनलो यावर माझ्या मनात असलेल्या बऱ्याच शंका दूर झाल्या. या ओळीतून आपण कसे होतो आणि आपण कसे आहोत यावर मार्मिक भाष्य केलं गेलं आहे. मानवी आयुष्यातील काही गोष्टी लोप पावत असताना भांडवलशाही आपल्या आयुष्याचा भाग कसा बनली आहे, हेही त्यातून प्रतीत होते. या ओळीमुळे जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन फार बदलला. आपण कसे निर्माण झालो, इतर प्राणी कसे तयार झाले व आता कसे ते ओळखले जातात यावर मोठा अभ्यास केला गेला याची आपल्याला पुसटशी तरी कल्पना असते का? याचे अ‍ॅप्लिकेशन काय? आणि ते दैनंदिन आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे समजून घ्यायला हवे. काही प्राण्यांच्या जीवनाची उक्रांती ही मनुष्यामुळे झाली आहे, कारण त्यांचे मूळ मानवी शरीराशी निगडित होते. अशी माहिती ही तथ्यातून मिळणं गरजेचं आहे. रहस्य तर सगळीकडेच असतात पण त्यातलं वास्तव महत्त्वाचं आहे. ते आज कुठल्याच माध्यमातून अचूक पोहचवलं जात नाहीत. त्यामुळे इथे मला पुस्तकांचा रोल महत्त्वाचा वाटतो. हे पुस्तक वाचल्यानंतर आपण ज्या जगात राहतोय ते एखाद्या जादूपेक्षा कमी नाही यावर विश्वास बसतो.