सार्थ तुकाराम गाथा या ग्रंथावर बंदी घालावी, संपादक व प्रकाशनावर अॅट्रासिटी दावा दाखल करावा या मागणीसाठी ब्लॅक पँथरच्या वतीने आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. संतप्त आंदोलकांनी दलित महिलांविषयी अश्लिल मजकूर घुसडण्यात आल्याचा आरोप करून या ग्रंथाचे दहन केले. सार्थ तुकाराम गाथा हा ग्रंथ अलीकडेच प्रकाशित करण्यात आला आहे. विष्णूबुवा जोगमहाराज हे त्याचे संपादक तर केशव ढवळे हे प्रकाशक आहेत. मूळच्या ग्रंथामध्ये नसलेल्या सुमारे ५० ओव्या या ग्रंथामध्ये घुसडण्यात आल्या आहेत, असा आरोप या संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला होता. त्याचवेळी ग्रंथावर बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदनही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. तथापि त्या संदर्भात कार्यवाही न झाल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ब्लॅक पँथरचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, डॉ. सुनील पाटील, विकास चोपडे, प्रशांत वाघमारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मी खाने, संगीता कांबळे, प्रिया कांबळे, चंद्रकांत चौगले, विकास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले. यावेळी सुमारे ५० आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.