आदिवासी संस्कृती ही स्त्रीप्रधान संस्कृती आहे. या संस्कृतीत महिलांचा सन्मान केला जातो. त्यांना पुरुषांबरोबरचा मान दिला जातो, त्यामुळेच आदिवासी समाजात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत नाहीत असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी केले. येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालयाने पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सहकार्याने तालुक्याच्या पश्चिम टोकाला असणा-या रतनवाडी येथे विद्यापीठस्तरीय गिर्यारोहण व जीवसृष्टीचा अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटनप्रसंगी पिचड बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठ कल्याण मंडळाचे संचालक पंडितराव शेळके होते.पिचड यांनी आपले भाषणात महाविद्यालयीन शिक्षणानंतरच्या आपल्या सामाजिक, राजकीय कार्याच्या आठवणींना आपल्या भाषणात उजाळा दिला. महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील अनेक गावात पायी हिंडलो. तेथील लोकजीवन समजून घेतले. माझे गुरू प्रा. ग. प्र. प्रधान यांनी मला सांगितले होते, तू ज्या समाजात जन्माला आलास त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी काही कर. तोच आदर्श मी जीवनभर पाळला. राघोजी भांगरे, गोविंद खाडे यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यसंग्रामाची आद्य लढाई या परिसरात लढली गेली असल्याची आठवण त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असा हा परिसर असून तेथील लोक स्वाभिमानी आहेत. आदिवासी संस्कृती ही उच्च विचारांची संस्कृती असून आदिवासी माणूस हा स्वाभिमानी आहे. या संस्कृतीचे जतन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. ज्या संस्कृतीने आम्हाला आदिवासीच ठेवले, आमच्यावर अन्याय केला ती संस्कृती आम्ही मानत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. प्राचार्य रमेशचंद्र खांडगे यांनी प्रास्ताविक केले. शिबिर संयोजक प्रा. अशोक दातीर यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. मीनानाथ पांडे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.