पत्नीपाठोपाठ पतीनेही आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार नगर तालुक्यातील मठपिंप्री येथे आज दुपारी घडला. नगर तालुका पोलिसांनी घटनेची नोंद केली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रावसाहेब अंकुश कदम (वय ३७) याने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली, तर त्याची पत्नी कविता (वय ३२) हिने विहिरीजवळच विषप्राशन केले. या दाम्पत्यास एकुलता एक मुलगा  आहे, तो यंदा बारावीला आहे.
अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक गांगुर्डे करत आहेत. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. मिळालेल्या माहितीनुसार प्रथम कविताने विषप्राशन केले, त्या वेळी रावसाहेब तेथेच होता, त्याने ही घटना लगेच मोबाइलवरून त्याच्या सुरत येथील मेहुण्यास कळवली व तुम्ही लोक लगेच येथे या नाहीतर मीसुद्धा दिसणार नाही असे तो म्हणाला. मेहुण्याने ही माहिती लगेच गावातील नातेवाईक व लोकांना कळवली. परंतु तोपर्यंत रावसाहेबने विहिरीत गळफास घेतला. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली.
मठपिंप्री गावापासून रावसाहेबची शेती दीड किलोमीटरवर आहे, शेतीत दोन विहिरी आहेत, विहिरींना पाणीही आहे, शेतात भेंडी, गवार अशी पिके घेण्यात आली आहेत. कविता हिचे माहेरही मठपिंप्रीतच आहे. घटनास्थळी चिठ्ठी आढळली नाही. नातेवाईक किंवा मुलगाही बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही, असे तपासी अधिकारी गांगुर्डे यांनी सांगितले.